दिवा शहरातील सर्वच रस्ते फेरीवाल्यांना आंदण,दिवा प्रभाग समितीने तात्काळ रस्ते मोकळे करून नागरिकांना दिलासा द्यावा,अन्यथा आंदोलन…..
अमित जाधव-संपादक
दिवा शहरातील सर्वच रस्ते फेरीवाल्यांना आंदण,दिवा प्रभाग समितीने तात्काळ रस्ते मोकळे करून नागरिकांना दिलासा द्यावा,अन्यथा आंदोलन!
भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांचा इशारा
दिवा:-दिवा शहरातील सर्व रस्ते हे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडचण निर्माण करणारे झाले आहेत.दिवा शहरातील प्रमुख रस्ते फेरीवाला मुक्त करा आणि शहरातील लाखो नागरिकांना दिलासा द्या,अन्यथा प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात आंदोलन करू असा इशारा भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.
रोहिदास मुंडे यांनी याबाबत दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त यांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की,या फेरीवाल्यांना रस्त्यावर बसवणारे दिवा शहर बकाल करत आहेत.दिव्यात एकही रस्ता हा मोठा नाही अशा स्थितीत आहेत ते रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्याने येथील 5 लाख जनतेने चालायचे कुठून आणि वाहन चालकांनी वाहने कुठून चालवायची.
फेरीवाल्यांना ज्यांनी अभय दिले आहे त्यांचे आर्थिक हितसंबंध या लोकांशी आहेत.चार पैशांसाठी दिवा शहराची वाट लावण्याचे काम केले जात आहे.दिवा स्टेशन ते आगासन रस्ता,दिवा स्टेशन ते मुंब्रा देवी कॉलनी रस्ता हे सर्वच रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत.यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा मिळत नाही असे मुंडे यांनी या पत्रात म्हटले आहे.
याबाबत सहायक आयुक्त यांनी तातडीने फेरीवाल्यांवर कारवाई करून दिवा स्टेशन रोड,मुंब्रा देवी कॉलनी रोड,दिवा आगासन रोड फेरीवाला मुक्त करावा .
फेरीवाल्यांना पालिकेने फेरीवाला झोन जाहीर करून त्याठिकाणी फेरीवाले पालिकेने बसवावेत जेणेकरून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होणार नाही.नवी मुंबईत ज्या पद्धतीने आतील रस्त्यांना किंवा गल्ली मध्ये फेरीवाला क्षेत्र असते,किंवा एखाद्या मैदानात फेरीवाले असतात त्या पद्धतीने दिवा शहरात रचना करावी. मुख्य रस्त्यावर असणारे फेरीवाले हटवून रस्ता नागरिकांसाठी मोकळा करावा अन्यथा याविरोधात नागरिकांच्या सहकार्य ने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.