उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून दिवा स्टेशन पासून १५० मीटर रस्ता फेरीवाला व ट्रॅफिक मुक्त करा* – शिवसेना उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत यांची पालिकेकडे मागणी

दिवा स्टेशन पूर्व परिसरात होणारी वाहतूक कोंडी सर्वश्रुत असून स्टेशन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फेरीवाल्यांमुळे व बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नागरिकांना येथून मार्ग काढणे कठीण झाले आहे. दिवा शहरात स्थायिक झालेला बहुतांशी नागरिक हा मध्यमवर्गीय असल्याने ९० टक्के पेक्षा जास्त नागरिक हा रेल्वे ने प्रवास करतो, परिणामी दिवा स्टेशन परिसर नेहमी गजबजलेला असतो. रेल्वे स्थानकात होणारी गर्दी व रेल्वे परिसरात रिक्षा, बस व छोटे मोठे व्यापार करणारे व्यापारी यामुळे या ठिकाणी नेहमीच अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात कठोर आदेश देऊन मध्य रेल्वे मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर परिसर हा फेरीवाला मुक्त, ट्रॅफिक मुक्त ठेवावा असे स्थानिक प्राधिकरणाला निर्देश दिले आहेत.
माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपण दिवा स्टेशन परिसर फेरीवाला व ट्रॅफिक मुक्त ठेवण्यासाठी १५० मीटर परिसरातील फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख अँड आदेश भगत यांनी सहायक आयुक्त यांच्या कडे केली आहे.
तसेच दिवा स्टेशन पूर्व परिसरात उड्डाण पुलासाठी उभे करण्यात आलेल्या शेवटच्या पिलर जवळ रस्ता अरुंद झाला असून त्या पिलर पासून दिवा चौकापर्यंत धंदा करणाऱ्या फेरीवाल्यांना मागे जाण्याचे निर्देश देऊन तिथे रस्ता करावा जेणेकरून त्याभागात ट्रॅफिक होणार नाही व नागरिकांना येण्याजण्यास कोणताही अडथळा होणार नाही अशी मागणी देखील अँड आदेश भगत यांनी केली आहे.