दिव्यातील आगरी कोळी वारकरी भवनासाठी 15 कोटी निधी* *खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश…
अमित जाधव - संपादक
ठाणे -दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २८ मधील बेतवडे येथे ३० कोटी रुपयांच्या निधीतून आगरी कोळी, वारकरी भवन उभारण्यात येत आहे. या भावनाचे काम प्रगतीपथावर असून त्याच्या पुढील उभारणीसाठी नगर विकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुदी अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला असून खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे यासाठी पाठपुरावा करत होते.
आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन घडवून देणारे हे भवन नागरिकांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. दिवा, कल्याण ग्रामीण व डोंबिवली परिसरात आगरी कोळी वारकरी संप्रदायाचे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. कल्याण लोकसभा क्षेत्रातील या सर्व विविध समाजातील नागरिकांच्या दृष्टीने त्या त्या भागात सांस्कृतिक भवन आणि समाज मंदिरे उभारण्यात येत असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्याने हे सर्व प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत. दिवा शहरातील बेतवडे येथील आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच भवनाच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यातील १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीच्या माध्यमातून भावनांची इमारत उभी राहत असून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी १५ कोटी रुपयांच्या निधीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाकडून मंजुरी मिळाली असून उर्वरित काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी सांगीतले.



