डोंबिवलीच्या एमआयडीसीत काल स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. आता या दुर्घटनास्थळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दाखल झाले आहेत. त्यांनी घटनास्थळी पाहणी करत सगळी माहिती घेतली आहे. या ठिकाणी सकाळपासून एनडीआरएफची टीम शोधमोहिम राबवत आहे. या शोधमोहिमेत आणखी तीन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढून अकरा झाला आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
डोंबिवलीच्या एमआयडीसी दुर्घटनास्थळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी भेट देत माहिती घेतली आहे. डोंबिवलीतील स्फोटाला शिंदे सरकार जबाबदार आहे, असा आरोप अंबादास दानवेंनी केला. महाविकास आघाडीच्या काळात येथील 5 कंपन्या हलवण्याचा निर्णय झाला होता. मात्र शिंदे सरकारने पुढे काहीच पाऊल उचलले नाही, असेही अंबादास दानवे म्हणाले. या दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शोधमोहिम सुरू आहे.



