शहरातील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष – पावसाळ्यात पाणी व घाणीचा गंभीर प्रश्न…. आमचं आयुष्य खेळणं नाही – स्वच्छ, सुरक्षित दिवा हवा आहे!”
अमित जाधव - संपादक
दिवा -दिवा परिसरातील नागरिकांना प्रत्येक पावसाळ्यात एकच समस्या भेडसावत आहे – पावसाचे पाणी घरामध्ये घुसणे, रस्त्यावर पाणी व घाण साचणे, आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आजारांचा धोका. दिवा हे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत असूनही, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात पालिकेचे प्रशासन अपयशी ठरत आहे.
रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. शाळा–कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे कामगार आणि वृद्ध नागरिक या सर्वांना यातून त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.
लोकप्रतिनिधी यांच्याकडून आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे. किती दिवस नागरिकांनी फक्त लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाच्या दाव्यांवर अवलंबून राहायचे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. लोकांच्या सहनशीलतेचा अंत होत चालला असून, जर योग्य उपाययोजना तातडीने करण्यात आल्या नाहीत, तर नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
पावसाळ्यातील ही समस्या वर्षानुवर्षे कायम असूनही आजवर ठोस तोडगा निघालेला नाही. नागरिकांचा ठाम प्रश्न असा आहे की – दिवा शहर ठाणे महानगरपालिकेच्या नकाशावर केवळ महसूल मिळवण्यासाठी आहे का? की येथे राहणाऱ्या हजारो लोकांच्या अडचणींनाही महत्त्व आहे?
आज गरज आहे ती प्रशासनाने वास्तव समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी जलनिस्सारण, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांची काळजी घेण्याची. अन्यथा दिव्यातील नागरिकांचा आक्रोश अधिक तीव्र होईल आणि प्रशासनावरील विश्वास पूर्णपणे ढासळेलमुकेश चंद्रभान शर्मा सामाजिक कार्यकर्ते यांनी बोलताना स्पष्ट केल आहे



