दिव्यात मतदार याद्यांमध्ये घोळ घालणारेच आता तक्रार करतायत! या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी- अँड.आदेश भगत
अमित जाधव-संपादक
दिव्यात मतदार याद्यांमध्ये घोळ घालणारेच आता तक्रार करतायत!
या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी- अँड.आदेश भगत
ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२२-२०२३ याकरिता प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. सदर प्रारूप मतदारयाद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी सर्वसाधारण नागरिकांना २३ जून ते ३ जुलै अशी वेळ देण्यात आली होती. या काळात दिवा विभागातील बऱ्याचशा नागरिकांनी आपली नाव प्रारूप मतदार यादीत दुसऱ्या प्रभागात गेल्याची तक्रारी दिवा प्रभाग समिती मध्ये केल्या होत्या. सदर हरकतींवर प्रभाग समितीमध्ये सुनावणी घेऊन सर्व हरकती निकाली काढण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयुक्तांकडे तक्रार करून प्रसिद्धी मिळवणाऱ्यांनीच प्रभाग क्रमांक ४५ मधील जवळजवळ ३७०० पेक्षा जास्त मतदार हे प्रभाग क्रमांक ४३ व प्रभाग क्रमांक ४४ मध्ये गेल्याची लेखी तक्रार ३० जुन रोजी दिवा प्रभाग समिती कार्यालयात केली होती आणि *प्रभाग क्रमांक ४३ आणि प्रभाग क्रमांक ४४ मधील मतदार प्रभाग क्रमांक ४५ चा नगरसेवक ठरवतील का?* असा प्रश्न अर्जात विचारण्यात आला होता. अशा प्रकारचे अर्ज करणार्यांनीच आता अंतिम मतदार यादीत प्रभाग क्रमांक ४३ व ४४ मधील तीन ते चार हजार मतदार हे प्रभाग क्रमांक ४५ मध्ये स्थलांतरित झाल्याची खोटी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. दिव्यातील मतदारांची खोटी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि नागरिकांची नावे खोटे अर्ज करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी तसेच कोणतीही लेखी हरकत नसताना सुद्धा मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी. तसेच प्रारूप मतदार यादींवर आलेल्या हरकती निकाली काढण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर वा कर्मचाऱ्यांवर देण्यात आली होती त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, या संदर्भात ठाणे महानगरपालिका आयुक्त तथा उपायुक्त निवडणूक विभाग यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही घटनांमध्ये तर दिवा प्रभाग समितीतील संबंधित अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीचं नाव या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित करण्याचा भीम पराक्रम सुद्धा केलेला आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आलेली आहे.