उत्सव 75 ठाणे’ महोत्सवाने ठाणेकरांना अधिक प्रगल्भ केले : डॉ. विनोद इंगळहळीकर ,रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाला उत्सव ठाणे 75 चा समारोप….
अमित जाधव-संपादक
‘उत्सव 75 ठाणे’ महोत्सवाने ठाणेकरांना अधिक प्रगल्भ केले : डॉ. विनोद इंगळहळीकर
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाला उत्सव ठाणे 75 चा समारोप
ठाणे : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा ठाणे शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला ही अद्वितीय अशी घटना आहे. कमी दिवसात ‘उत्सव 75 ठाणे’चा घाट घालणे सोपे नाही. एक शहर, पंचाहत्तर वर्षे, साठ संस्था, वीस ठिकाणी, पंचाहत्तर कार्यक्रम तीन दिवस साजरे करुन ठाणे शहराने खऱ्या अर्थाने अमृतमहोत्सव साजरा केला असल्याचे सांगत ठाणेकरांना अधिक प्रगल्भ व्हायला हा महोत्सव मोलाचा ठरला असल्याचे उद्गगार उत्सव 75 ठाणेच्या समारोप सोहळ्यात नामवंत डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी काढले.
उत्सव 75 ठाणे या महोत्सवाचा समारोप सोमवारी (15 ऑगस्ट) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे पार पडला. यावेळी उत्सव ठाणे 75 चे स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त् संजय हेरवाडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त् बाळासाहेब चव्हाण, शासनाच्या पर्यटन विभागाचे प्रतिनिधी, उत्सव 75 ठाणेचे संजीव ब्रह्मे आदी उपस्थित होते.
ठाणे शहर युनिक वेगळं शहर आहे. 60 संस्था एकत्र आल्या, कोणालाही कोणतंही पद नव्हतं तरी हा कार्यक्रम कसा झाला? इथे कोणी हात लावला हे महत्वाचे नाही पण प्रत्येकाने हात लावला म्हणून या उत्सव चा रथ पुढे गेला.. या उत्सवात निव्वळ मनोरंजन कमी होतं पण यातील प्रत्येक कार्यक्रमातून प्रत्येकाने घरी काही ना काही नेलं.. कोणी आठवणी नेल्या.. कोणाला काही शिकता आले. एका अर्थाने या उत्सवातील कार्यक्रमांनी ठाणेकरांना श्रीमंत केले असल्याचेही डॉ. इंगळहळीकरांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल आणि अशाप्रकारचा महोत्सव आयोजित केल्याबद्दल त्यांनी ठाणे महापालिकेचेही कौतुक केले.
ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, या शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. परंतु ही साहित्यिक सांस्कृतिक चळवळ अधिक जोमाने पुढे नेणे किंबहुना येणाऱ्या नवीन पिढीला या चळवळीत सामावून घेण्याचे काम करणे आवश्यक आहे. हा महोत्सव जेव्हा ठरला तेव्हा अनेक साहित्यप्रेमी ठाणेकर पुढे आले. एकामागून एक असे अनेक हात पुढे आले आणि या उत्सव 75 ठाणेची निर्मिती झाली असल्याचे उत्सव 75 ठाणेचे स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के यांनी नमूद केले. 75 कार्यक्रमाना ठाणेकर येतील का? असा विचारही मनात आला, पण गर्दी जमवण्यापेक्षा या उत्सवाला दर्दी प्रेक्षक असणे महत्वाचे होते. अनेक ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना गर्दी कमी होती त्यावर अनेकांनी टिकाही केली परंतु जी गर्दी होती ती दर्दींची होती. अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम झाले. 1947 ते 1948 या कालावधीत जन्मलेल्या ज्येष्ठ ठाणेकरांचे स्नेहसंमेलन झाले.. दिव्यांगांचा फॅशन शो झाला असे अनेकविध कार्यक्रम की ज्यांची कल्पनाही करु शकत नाही असे कार्यक्रम या महोत्सवात ठाणेकरांना पाहायला मिळाले असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला त्यांचेही आभार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या समारोप कार्यक्रमात उत्सव 75 ठाणेमध्ये झालेल्या निबंध, वक्तृत्व, नृत्य, समूहगान, पाककला, फॅशन शो, मिस, मिसेस, मिस्टर ठाणे, बालनाट्य स्पर्धा, विविध रॅली आदींमध्ये विजेत्या ठरलेल्या व कार्यक्रमासाठी उत्कृष्ट नियोजन व सहकार्य करणाऱ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद इंगळहळीकर, स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के, अतिरिक्त् आयुक्त् 2 संजय हेरवाडे, उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले