जिल्ह्यात ७ महानगरपालिका आहे, हे का झालं ? कारण बाहेरून येणारे लोंढे. हे आक्रमण आहे हे तुम्हाला जाणवतंय का ? एक दिवस असा असेल तुमच्या हातात पश्चातापाशिवाय काही राहणार नाही..
अमित जाधव - संपादक
आजपर्यंतच्या जगभरातील लढाया ह्या जमिनीच्या किंवा भूभागाच्या मालकी हक्कावरूनच झाल्या आहेत आणि मराठी जनांनी जमीन गमावली तर उद्या तुम्हाला तुमची भाषा आणि संस्कृती पण गमवावी लागेल. शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू झाला, रायगड जिल्हा मुंबईशी थेट जोडला गेला. धनदांडग्यांना आपला रायगड जिल्हा हाकेच्या अंतरावर आला. खरंतर रस्ते हे प्रगतीचे वाहक असतात पण महाराष्ट्रात त्या प्रगतीमागून दबक्या पावलांनी येणारी समाजाची अवनती मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाव घालते. म्हणून रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी जागल्याची भूमिका घ्यावी, जागृत राहावं… लोकांना शहाणं करावं. या भावनेतून मी आज अलिबागमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्या परिसंवादातील महत्वाचे मुद्दे :
• आज मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड इथे मोठ्या प्रमाणावर कशा जमिनी बळकावल्या जात आहेत ह्याचं पुरेसं भान आपल्याला आलेलं दिसत नाहीये.
• अलिबागच्या परिसरातील अनेक गावातील जमिनी आज विकल्या गेल्या आहेत. मला समजू शकतं की जमीन विकून मिळणारा पैसा प्रत्येकाला हवा आहे पण जमीन विकल्यावर ती कोणाच्या घशात जात आहे, तुम्हाला पुरेसा भाव मिळतोय का ह्याची खात्री करून घेताय का?
• जगाचा इतिहास भूगोलाशिवाय नाही, सगळा खटाटोप जमिनीच्या मालकीसाठीच झाला. आज ट्रान्सहार्बर झालाय ह्यामुळे रायगडमधल्या जमिनी स्थानिक लोकांच्या हातातून जाणार, हे नक्की.
• आज दुबईमध्ये तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तिथल्या अरबांना भागीदार करून घ्यावं लागतं तरच तुम्ही तिथे व्यवसाय करू शकता… मग तुम्ही रायगडमध्ये सुरु होणाऱ्या व्यवसायांत तुम्ही भागीदार का होत नाही ?
• आज जमिनींचे जे रजिस्ट्रेशन सुरु आहे त्यात जमिनी कोण घेत आहे ह्याचा एकदा तपास घ्याच. तुम्हालाही कळेल आपण किती बेसावध आहोत ते.
• एक शिवचरित्रातलं उदाहरण सांगतो की सुरतेवर जेंव्हा स्वारी झाली, तेंव्हा महाराज अनेक व्यापाऱ्यांना पत्र पाठवत होते, तेंव्हा इस्ट इंडिया कंपनीची वखार होती. तिथला प्रमुख होता जॉर्ज ऑक्सेंडेन. त्याच्या हाताखाली ४०० माणसं होती. महाराजांचं पत्र त्याला पण गेलं. त्याने पत्राला उत्तर दिलं की तुम्ही जे सांगताय ते आम्हाला मान्य नाही. त्याचं बघून काही व्यापाऱ्यांनी पण तसंच सांगितलं. त्यावेळी इनायत खान म्हणून औरंगजेबाचा माणूस सुरतेत होता. त्याच्या माणसांनी महाराजांवर हल्ला केला म्हणून महाराजांच्या मावळ्यांनी हल्ला करून इनायत खानला पळवून लावलं. औरंगजेबाचा दुसरा खास माणूस होता महाबत खान. जेंव्हा त्याला कळलं की जॉर्ज ऑक्सेंडेनने मुगलांना बळ दिलं तेंव्हा त्याने हिरेमाणक्याने लगडलेली तलवार त्याला भेट दिली. पण जॉर्ज ऑक्सेंडेनटने सांगितलं की जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर इस्ट इंडिया कंपनीला सुरतमध्ये व्यापारात ५०% सवलत द्या. ही झाली खरी निष्ठा.
• साम्राज्य असंच वाढत असतं. जॉर्ज ऑक्सेंडेन जर असा विचार करू शकतो तर मग आपण मराठी माणसं असा का विचार करू शकत नाही.
• पुण्यात एक काश्मिरी रेस्टोरंट आहे, ज्याचा शेफ काश्मिरी आहे पण मालक दोन मराठी मुलं आहेत, मला असंच चित्र सर्वत्र महाराष्ट्रात हवं आहे. पण बाहेरून येणाऱ्यांना तुम्ही संधी देत राहिलात तर उद्या तुमची भाषा निघून जाईल.
• आज ठाणे जिल्ह्यात ७ महानगरपालिका आहे, हे का झालं ? कारण बाहेरून येणारे लोंढे. हे आक्रमण आहे हे तुम्हाला जाणवतंय का ? एक दिवस असा असेल तुमच्या हातात पश्चातापाशिवाय काही राहणार नाही.
• तुम्हाला वाटेल मी घाबरवतोय, तर हो घाबरवतोय कारण बाकी कुठलाही राजकीय नेता तुम्हाला हे सांगणार नाही.
• काश्मीरमध्ये ३७० कलम काढलं, त्याने नक्की काय घडलं हे बाजूला. ३७० कलम होतं तेंव्हा तुम्ही तिकडे बाहेरच्यांना जमीन घ्यायला परवानगी नाही. हिमाचल, उत्तराखंड, आसाममध्ये बाहेरच्यांना जमीन घेता येत नाही मग महाराष्ट्रात का घेऊ दिल्या जात आहेत?
• आज मी अप्पासाहेब धर्माधिकारींना भेटलो होतो. त्यांच्याकडे खूप मोठी ताकद आहे, मी त्यांना विनंती केली की त्यांनी पण ह्या विषयवार लोकांचं प्रबोधन करावं.
• आपण आपली जमीन वाचवली पाहिजे. आज महाराष्ट्रात जे जे उत्तम आहे ते सर्वबाजूनी बळकवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
• पत्रकार बांधवांनो, आपण गंभीर व्हायला पाहिजे, आजही चर्चांमध्ये माहितीचे दाखले देताना म्हणतात ‘मी हि बातमी पत्रकारांकडून ऐकली आहे’ म्हणून तुमची जबाबदारी वाढते. तेव्हा तुम्हीही स्थानिकांच प्रबोधन तुम्ही केलं पाहिजे.



