बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी शाळांमध्ये राबविणार ‘ईट राईट स्कूल’ उपक्रम – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

अमित जाधव-संपादक

मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी
शाळांमध्ये राबविणार ‘ईट राईट स्कूल’ उपक्रम
– जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणे (जिमाका) :- शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार व स्वच्छतेचे महत्त्व कळावे व त्यांचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी ठाणे जिल्ह्यात ‘ईट राईट स्कूल’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभागी होऊन शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत सकस आहाराचे महत्त्व पोचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय अन्न व मानके कायदा अंतर्गत समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यावेळी अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तथा ईट राईट स्कूल उपक्रमाचे राज्याचे नोडल अधिकारी दिगंबर भोगावडे, अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त धनंजय काडगे, सहायक आयुक्त भू.दि. मोरे, जिल्हा अन्न व नागरी पुरवठाचे एस.एस. प्रधान, जिल्हा रुग्णालयातील आहार तज्ञ प्रिया गुरव, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील रंजना सोनावणे, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार पोवार, ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील संगीता बामणे, बालविकास अधिकारी अशोक बागूल, जे. एस. टोकेवार आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. नार्वेकर म्हणाले की, भावी पिढी सुदृढ रहावी, त्यांना सकस व योग्य आहार मिळावा, यासाठी आतापासूनच जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी ईट राईट स्कूल हा उपक्रम संवेदनशीलपणे राबविण्यात यावा. तसेच स्वच्छतेबद्दल मुलांमध्ये माहिती व्हावी, यासाठीही या उपक्रमात स्थान देण्यात आले आहे. या उपक्रमात प्रत्येक शाळेला वेगवेगळे गुणांकन असणार आहे. जास्तगुण मिळालेल्या शाळांचा गौरव होणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहचवावी. विद्यार्थी व शिक्षकांना यामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.
श्री. भोगावडे यांनी या उपक्रमाच्या स्पर्धेची माहिती दिली. ही स्पर्धा देशभरात राबविला जात असून राज्यातही सर्व जिल्ह्यांमध्ये उपक्रमामध्ये शाळांची नोंदणी करणे सुरू आहे. या उपक्रमात शासकीय, निमशासकीय तसेच खासगी शाळांनाही https://eatrightindia.gov.in/eatrightschool/ या संकेतस्थळावर नोंदणी करून सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या शाळांना गुणांकन दिले जाणार आहे. त्याआधारे उत्कृष्ट शाळांची निवड करण्यात येणार आहे. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील सुमारे पाचशे शाळांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत ठाणे, मिरा भाईंदर व नवी मुंबई महानगरपालिकांमधील शाळांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती श्री. भोगावडे यांनी दिली.
अन्न सुरक्षा सप्ताहामध्ये ठाणे जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले असल्याचीही माहिती श्री. भोगावडे यांनी दिली. तर ईट राईट चॅलेंज अंतर्गत जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांचीही ऑनलाईन नोंदणी मोहिम राबविण्यात आली असल्याची माहिती श्री. काडगे यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे