यंदा दिवा व मुब्रा या स्वतंत्र प्रभाग समित्यांनी धवजरोहन न केल्यास सर्व दिव्यांग कार्यालयात जाऊन ध्वजारोहण करतील…..युसूफ खान
अमित जाधव-संपादक
ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे महानगर पालिकेच्या मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र भारताचा ध्वजच फडकाविण्यात आला नसल्याची तक्रार दिव्यांग नेते युसूफ खान यांनी ठामपा आयुक्तांकडे केली आहे. यंदा या प्रभाग समित्यांमध्ये ध्वजारोहन केले नाही तर सर्व दिव्यांग कार्यालयांमध्ये जाऊन स्वत:हून ध्वजारोहन करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
खान यांनी या संदर्भात पालिका आयुक्त तसेच जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ठाणे महानगर पालिकेच्या अखत्यारित असलेल्या दिवा आणि मुंब्रा प्रभाग समितीचा कारभार दोन वेगवेगळ्या सहाय्यक आयुक्तांच्या अखत्यारित चालत आहे. स्वतंत्र पदभार असलेल्या अधिकार्यांकडून कारभार चालत असतानाही इतर प्रभाग समित्यांप्रमाणे या दोन्ही प्रभाग समित्यांमध्ये स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे हर घर तिरंगा सारखे अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, ठाणे महानगर पालिकेच्याच प्रभाग समितीमध्ये जर ध्वजारोहन/ध्वजवंदन होत नसेल तर ते ठाणे शहराच्या दृष्टीने लाजीरवाणे आहे. त्यामुळे आपण योग्य ते आदेश देऊन सदर ठिकाणी ध्वजारोहन करण्याचे आदेश संबधितांना द्यावेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.