शिक्षण हक्क अधिनियमानुसार (RTE )शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी २५ टक्के आरक्षित जागांसाठी 9597 विद्यार्थ्यांची निवड,२३ जुलै २०२४ पासून प्रवेश प्रक्रिया होणार सुरू,ठाणे जिल्ह्यासाठी 643 शाळांमध्ये प्रवेश..
अमित जाधव - संपादक
ठाणे, दि. २१ – शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी (दिनांक २० जुलै २०२४) https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीनुसार ठाणे जिल्ह्यासाठी 643 शाळांमध्ये 9597 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील 643 पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी 11339 जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांनी महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका व रिट याचिकेवर (दिनांक १९ जुलै २०२४) रोजी अंतिम निर्णय दिला आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दिनांक ७ जून २०२४ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीची निवड यादी व प्रतिक्षा यादी शनिवारी, दिनांक २० जुलै २०२४ रोजी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण 643 पात्र शाळांमध्ये एकूण 19568 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 9597 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
*पालकांना येणार संदेश*
या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवार (दिनांक २२ जुलै २०२४ पासून संदेश (एसएमएस) येण्यास सुरुवात होईल.
*असा घ्या प्रवेश*
प्रवेश मिळाल्याचा संदेश प्राप्त झालेल्या पालकांनी संकेतस्थळावर जाऊन प्रवेश पत्राची प्रिंट घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या संबंधित तालुकास्तरीय पडताळणी समितीकडे आवश्यक कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रति घेऊन जावे. समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी प्रत्यक्ष प्रवेशासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे. तसेच पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संबंधित संकेतस्थळावर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्रमांक टाकून त्याचा प्रवेश निश्चित झालेला आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.