उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाला शुभारंभ.. उत्सव वसुंधरेचा, संकल्प हरित ठाण्याचा अंतर्गत पर्यावरण प्रदर्शनाचेही केले उद्घाटन..
अमित जाधव - संपादक

ठाणे (०५) :* ठाणे महानगरपालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘हरित ठाणे अभियाना’त वर्षभरात दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानाचा शुभारंभ गुरूवारी सकाळी रेमंड कंपनी येथे महापालिकेच्या नियोजित नवीन वास्तूच्या प्रांगणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
त्याचबरोबर, नौपाडा येथील गावदेवी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्सव वसुंधरेचा, संकल्प हरित ठाण्याचा अंतर्गत शून्य कचरा आणि पर्यावरणाच्या भव्य प्रदर्शनाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनही त्याचवेळी करण्यात आले. हे प्रदर्शन रविवार, ०८ जूनपर्यंत स. १० ते रा. १० या वेळेत सगळ्यांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
ठाणे आणि परिसरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचे हे दुसरे वर्ष आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने दोन लाख पाच हजार झाडे लावण्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले आहे. त्याची सुरूवात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी राज्य फुल असलेला ताम्हण, बकुळ आणि बांबू प्रजातीमधील तुरडा या तीन वृक्षांचे रोपण करून या अभियानचा आरंभ केला, तसेच, नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त मधुकर बोडके, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या अभियानात, ठाण्यात एकूण दोन लाख पाच हजार झाडे लावली जातील. त्यात, मियावाकी पद्धतीने ३० हजार झाडे, विविध विकासकांमार्फत पाच हजार झाडे, खाजगी संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, निवासी गृहसंकुले आणि शासकीय कार्यालयांच्या सहभागातून पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, शेवग्याची १० हजार लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, महापालिकेतर्फे, आतकोली येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात बांबू प्रजातींच्या पाच हजार विशेष झाडे लावली जाणार आहेत. प्रादेशिक वन विभागाची जागा व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे महापालिकेतर्फे एकूण एक लाख ३० हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. कोलशेत एअर फोर्स स्टेशन परिसरात मियावाकी पद्धतीने २०,००० झाडे लावण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. गेल्या वर्षी या अभियानात ठाणे महापालिकेने एकूण एक लाख २७ हजार झाडे लावली.