दिव्यातील समस्यांवरून ठाकरेची शिवसेना आक्रमक – पालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
अमित जाधव - संपादक
ठाणे : दिव्यातील समस्यांवरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आक्रमक झाली आहे. दिवा शहरातील पाणीप्रश्न, सांडपाणी व्यवस्था, रस्ते, गतिरोधक, पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन अशा विषयांबाबत येथील ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. याप्रश्नी पालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी आयुक्तांकडे यावेळी करण्यात आली.
दिव्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून प्रभाग क्र. २७ मध्ये कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच संपूर्ण दिव्यात मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी तातडीने कारवाई करावी. दिवा पश्चिमेला रेल्वे रूळा खालून पूर्व – पश्चिमेला जोडणारी पुश थ्रू पध्दतीने टाकण्यात येणाऱ्या लाइन ला रेल्वेने मंजुरी दिली आहे तरी महानगरपालिकेकडून लवकरात लवकर कार्यवाही करून ती पूर्णत्वास आणून तेथील लोकांची पाणी टंचाई पासून मुक्तता करावी. काही भागातील नाले बंदिस्त करून सांडपाण्याचे व्यवस्थापन तातडीने करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख सचिन पाटील ह्याच्या नेतृत्वखाली पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेविका अंकिता पाटील युवासेना शहर अधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर संघटक प्रियांका सावंत, वैष्णव पाटील उपस्थित होते. यासोबत गणेशोत्सवापूर्वी दिव्यातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करावी, दिवा स्टेशन ते आगासन रोड तसेच दिवा स्टेशन ते साबे रोड आणि मुंब्रादेवी कॉलनी रस्ता काँक्रीटीकरण केल्यामुळे रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावेत, तसेच दिवा चौकात उभारण्यात आलेल्या चौकाच्या शिल्पावरून स्थानिक भूमिपुत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेला असंतोष त्यामुळे आगरी-कोळी शिल्प उभारावे, पथदिवे बसवावे ही मागणी निवेदनात करण्यात आली.
दिव्यात कचऱ्याचे व्यवस्थापन घंटागाडीद्वारे करण्यात येते. मात्र उघड्यावर टाकला जाणारा कचरा नियमित उचलला जात नसल्याने शहरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. त्याकरिता दिवा शहरातील कचऱ्याचे संकलन घरोघरी जावून नियमितपणे करण्यासाठी संबधितांना आदेश देण्याची विनंती या शिष्टमंडळाने आयुक्त बांगर यांना केली.
———–