बौध्द समाजातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावासनिमित्त आज मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बौद्ध भिख्खूना खास आमंत्रित…
अमित जाधव - संपादक

मुंबई -बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावासनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बौद्ध भिख्खूना खास आमंत्रित करण्यात आले होते. यानिमित्ताने वर्षा बंगल्यावर भगवान बुद्ध आणि बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्रिशरण पंचशील प्रार्थना करण्यात आली. तसेच यानंतर या बौद्ध भिख्खूना चिवरदान, धम्मदान आणि अन्नदान करण्यात आले. आज आपल्यासारखे बौद्ध धम्माचे उपासक माझ्या वर्षा निवासस्थानी आल्यामुळे इथे सुखाचा ‘वर्षा’व झाल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध आणि आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अलौकिक समाधान मिळाल्याचे मत व्यक्त केले.
जगात अनेक ठिकाणी युद्ध सुरू असली तरीही जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. राज्यात त्यांचा संदेश पोहचवावा यासाठी आम्ही सामजिक न्याय भवन तर उभारलेच पण त्यासोबत राज्यातील महायुती सरकारने जिल्हा आणि तालुका स्तरावर संविधान भवन उभारण्याचा निर्णयही घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे हे सरकार आहे असे स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर येथे अजंठा एलोरा लेण्यांचा विकासही आम्ही करत आहोत असे देखील यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेना सह मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे, शिवसेना प्रवक्त्या सौ. ज्योती वाघमारे तसेच एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अभिजित गायकवाड तसेच बौद्ध भिख्खू महासंघाचे राज्यभरातून आलेले सर्व बौद्ध भिख्खू आवर्जून उपस्थित होते.