बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

इतिहास नवी मुंबईचा हे केवळ पुस्तक नसून उत्तम संशोधन – पद्मश्री मधु मंगेश कर्णिक…

अमित जाधव-संपादक

इतिहास नवी मुंबईचा हे केवळ पुस्तक नसून उत्तम संशोधन
– पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

मुंबई-गणेश हिरवे

नवी मुंबई दि.१०, (प्रतिनिधी) अमृत पाटील नेरुळकर हे खऱ्या अर्थाने एक प्रतिभावंत साहित्यिक असून त्यांनी इतिहास नवी मुंबईचा या पुस्तकाच्या माध्यमातून इतिहासाचा धांडोळा घेतानाच भूगोलालाही चांगला न्याय देत येथील भूभाग, हवामान, पर्जन्यमान, वनउपज, जलसंपदा, जनजीवन यांची सविस्तर व अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे. इतिहास नवी मुंबईचा हे पाटील यांचे केवळ ऐतिहासिक पुस्तक नसून पुढे आलेलं एक उत्तम संशोधन आहे. हे पुस्तक सहज वाचायला घेतलं आणि शेवटपर्यंत वाचत गेलो एवढे हे पुस्तक वाचनीय झाले आहे. म्हणूनच हे पुस्तक शालेय विदयार्थी, शिक्षक, वाचक, पर्यटक, अभ्यासक यांना मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी नेरुळ येथे केले. शनिवारी अमृत पाटील नेरुळकर लिखित इतिहास नवी मुंबईचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नेरुळ येथील वेलकम हॉल येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार संजीव नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नामदेव भगत, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश म्हात्रे, माजी नगरसेविका माधुरी ताई सुतार, इतिहास संशोधक डॉ. अनंत देशमुख, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील , ज्येष्ठ विधीज्ञ पी. सी. पाटील, साहित्यिक मोहन भोईर, साहित्यिका दमयंती भोईर, डॉ. अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील, दिपक भोपी, उपायुक्त संजय टेकाडे, ज्येष्ठ पत्रकार अंकुश वैती, विश्वरथ नायर, सुभाष हांडे देशमुख, माजी सरपंच मधुकर ठाकूर, प्रकाशिका सौ अरुणा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या, शहराचा गावाचा, इतिहास संवर्धित करुन तो शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना शिकविणे गरजेचे असल्याचे आपल्या प्रस्तावनेत जेष्ठ साहित्यीक सुभाष हांडे देशमुख यांनी सांगितले.
नवी मुंबईचा इतिहास घरा – घरात पोहचावा हा साहित्यिक अमृत पाटील यांचा एक चांगला संकल्प असून या कामास आमच्या संस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी दिले तर ज्येष्ठ
विधीज्ञ पी. सी. पाटील यांनीही यास दुजोरा देत १२५ पुस्तके खरेदी करुन या संकल्पाचा श्रीगणेशा केला.
दुर्लक्षित क्षेत्रात कुणी तरी उडी घेण्याचं धाडस करावं लागतं ते काम अमृत पाटील या उमद्या तरुणाने गेली १२ वर्षे अगदी संयतपणे करुन येथील ऐतिहासिक ठेवा प्रकाशात आणाला आहे. याचा पुढील पिढीला १०० वर्षे लाभ होणार असल्याचे इतिहास संशोधक डॉ. अनंत देशमुख यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबईत सर्व काही आहे परंतु या शहराचा इतिहास संवर्धित झालेला नव्हता ही फार मोठी कमतरता होती. ही कमतरता साहित्यिक अमृत पाटील यांनी भरुन काढली असून आता ऐतिहासिक लेखकांच्या नामावलीत अमृत पाटील नेरुळकर या एका आगरी साहित्यिकाच्या नावाचाही समावेश होणार आहे. याचा अभिमान वाटतो. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी केले.
इतिहास नवी मुंबईचा हे अमृत पाटील यांच्या सारख्या एका सिद्धहस्त लेखकाने लिहिलेलं एक सिद्ध पुस्तक असून या पुस्तकातील माहितीतील अचूकता, चित्तवेधक शैली व नव्यानं पुढं आलेलं संशोधन यामुळे हे पुस्तक नवी मुंबईतील सर्व घटकातील
नागरिकांबरोबरच विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल असे मत रायगड भूषण प्रा.एल. बी. पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नवी मुंबईतील उमेदीच्यास ५४ कलावंतांना भजन सम्राट हंसारामबुवा नेरुळकर कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. रंजना केणी यांनी केले तर नंदकुमार म्हात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे