बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचे वतीने अवयवदान व देहदान याबाबत जनजागृती..

अमित जाधव-संपादक

*राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचे वतीने अवयवदान व देहदान याबाबत जनजागृती*

को ल्हापूर :

मरावे परी, अवयव रुपी उरावे ! असे आवाहन यशोदर्शन फाउंडेशनचे प्रमुख व शिखरावरी मासिकाचे संपादक योगेश अग्रवाल यांनी केले. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने सातत्याने समाजप्रबोधनाचे व लोकहिताचे विविध उपक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून अवयवदान, त्वचादान, देहदान, नेत्रदान, रक्तदान हे दान करणे सद्यस्थितीत किती महत्त्वाची आहे, याचे महत्त्व जाणून राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांचेवतीने सदर व्याख्यानाचे आयोजन करणेत आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते योगेश अग्रवाल यांनी अवयवदान आणि देहदान असे या विषयाचे दोन भाग असून अवयवदान आणि देहदान हे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत. जेव्हा आपण अवयवदान करतो तेव्हा देहदान होऊ शकत नाही आणि जेव्हा देहदान करतो तेव्हा शरीराच्या अंतर्गत अवयवांचे अवयवदान होऊ शकत नाही. अवयवदान हे एखादी व्यक्ती जिवंतपणी काही मर्यादित स्वरूपात व मेंदू मृत झाल्यानंतर विस्तृत स्वरूपात करू शकते. तर देहदान हे नैसर्गिक मृत्यूनंतर म्हणजेच हृदय क्रिया बंद पडून झालेल्या मृत्यूनंतर करता येते. अशावेळी देहदान करण्यासाठी मृत देह वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूनंतर सहा तासांच्या आत पोहोचवावा लागतो. तत्पूर्वी फक्त नेत्रदान, त्वचादान होऊ शकते. जिवंतपणी कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही अवयवांचे दान करू शकते. म्हणजे दोन पैकी एक किडनी, यकृताचा कांही भाग, फुफ्फुसाचा काही भाग, स्वादुपिंडाचा कांही भाग, आतड्याचा कांही भाग, गर्भाशय आदी.
कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य एका किडनीवर व्यवस्थितपणे व्यतीत होऊ शकते. एका शरीरातून दुसर्‍या शरीरात एखादा अवयव प्रत्यारोपित केला जातो, त्यावेळी तो अवयव दोन्ही शरीरात ठरावीक कालावधीनंतर पूर्ण आकार धारण करून संपूर्णपणे कार्यरत होत असतो. त्यामुळे शरीराला कोणताही धोका संभवत नाही. जिवंतपणे वरील अवयवदान करून, गरजू रुग्णांच्या आयुष्यात आनंद फुलविता येतो आणि त्याला कोणताही शारीरिक धोका उद्‌भवत नाही. मृत्यूनंतर म्हणजेच ब्रेन डेड झाल्यानंतर त्या व्यक्तीला वेंटीलेटरवर ठेवले जाते. त्यावेळी विशिष्ट परीक्षणाद्वारे त्याचा मेंदू पूर्णपणे कार्य करण्याचे थांबलेला आहे, हे निश्चित करता येते. त्यावेळेला त्या रुग्णाच्या शरीरातील आठ ते नऊ अवयव एखाद्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात.
सुमारे ४० ते ५० अवयव हे एखाद्या रुग्णाच्या आयुष्यात त्याच्या अवयवांची कमी झालेली कार्यक्षमता वाढविण्यासाठी, अथवा अवयवांमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी, प्रत्यारोपित करता येतात. यामध्ये प्रामुख्याने दोन मूत्रपिंडे, यकृत, हृदय, फुप्फुसे, स्वादुपिंड, आतडी, डोळे तर कांही अवयव दुसऱ्या रुग्णाच्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी उपयोगी पडतात. (हात, पाय, गर्भाशय, कानाचे पडदे, हाडे, झडपा वगैरे.)
कोणत्याही प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे अवयव किंवा मृतदेह यांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करता येतो. त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषतः वारस नातेवाईकांनी जर अवयवदान व देहदान यास संमती दिली तर, अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या देशात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू हा त्यांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने होत असतो. सदर बाब इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे. यातील कित्येक मृत्यू आपण फक्त आपल्या संकल्पाने आणि आपल्या वारस नातेवाईक यांनी आपण केलेल्या संकल्प पुर्तीने आपण वाचवू शकतो. देहदानाचा संकल्प करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडून देहदानाचे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकते. वैद्यकीय महाविद्यालयांच्या वेबसाईटवरती असे संकल्पपत्र उपलब्ध होऊ शकेल. ते संकल्प पत्र भरून आपण देहदानाचा संकल्प करू शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही नेत्रपेढी मार्फत नेत्रदानाचे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकते. अशी इत्यंभूत व महत्त्वपूर्ण माहिती योगेश अग्रवाल यांनी देऊन उपस्थित सर्वांचेच प्रबोधन केले.
म्हणून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई व यशोदर्शन फाउंडेशन, कोल्हापूर आणि मासिक शिखरावरी, कोल्हापूर या संस्थेच्यावतीने अवयवदान व देहदान प्रचार, प्रसिद्धी करीत आहोत असे स्पष्ठ करून – जीना उसका जीना है, जो औरोंको जीवन देता है ! अशी भावनिक साद घालत, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या राज्यातील सर्वच सभासदांनी या अभियानास साथ द्यावी. त्याचबरोबर सर्वार्थाने जी कांही मदत करणे शक्य असेल ती करावी, असे आवाहन योगेश अग्रवाल यांनी केले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आज देशासमोर अवयवदान व देहदानाच्या माध्यमातून ज्या गंभीर समस्या उभ्या राहिलेल्या आहेत, याबाबत सर्व जनतेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. या जगात अनेक प्रकारचे दान फक्त पैसेवाले लोक करू शकतात. पण अवयवदान, नेत्रदान, देहदान, त्वचादान, रक्तदान हे असे दान आहे जे प्रत्येक व्यक्ती करू शकते. आपण भाग्यवान आहोत की आपण दात्यांच्या यादी मध्ये आहोत. कल्पना करा की आपण याचिकाकर्ते (गरजूंच्या यादीत) असतो तर आपली काय अवस्था झाली असती. आपल्या देशामध्ये लाखो लोक अवयवांची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांचा मृत्यू होतो. पण अवयव मिळत नाही. कांही गंभीर भाजून जखमी झालेले असतात त्यांच्या जखमांवर दुसरी त्वचा लावल्याशिवाय जखमा भरत नाहीत. या जखमांतुन होत असलेल्या वेदनांचा विचार करून अंगावर शहारे येतात. आज भारतात अवयवदानाचे प्रमाण ०.१६ इतके आहे त्यामुळे अवयवदान ही काळाची गरज आहे. याबाबत जरी एखाद्या दात्याने आपले नाव संबंधित यंत्रणेकडे नोंद केले असले तरी, त्याच्या मृत्यू पश्चात संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी जर या गोष्टीस नकार दर्शवला तरी याबाबत कोणतीही जबरदस्ती अगर सक्ती केली जात नाही. त्यामुळे सामाजिक संस्था त्याचबरोबर शासनाने सुद्धा योग्य ते सहकार्य करून ही चळवळ जनताभिमुख होणेसाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.
यावेळी अनिता काळे यांनी आजपर्यंत स्वतःच्या माध्यमातून अवयवदान व देहदान याबाबत पदयात्रा व मेळावे घेऊन जनजागृती केली असल्याची थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती विषद केली व यापुढील काळात जनजागृतीसाठी कटिबध्द असलेचे अभिवचन दिले. तसेच भगवान माने, महादेव चक्के, मुनीर मुल्ला, संजय सासणे, शिवाजी चौगुले आदींनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमांमध्ये असोसिएशनच्यावतीने योगेश अग्रवाल यांचा महादेव चक्के यांच्या हस्ते पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला.
सदर प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वी करणेकरीता संजय सासणे, अनिता काळे, महादेव चक्के, मुनीर मुल्ला, भगवान माने, शिवाजी चौगुले, प्रताप घेवडे, संजय चव्हाण, दत्तात्रय पाटील, रघुनाथ मुधाळे, अनिल निकम, बाबासो ढेरे, विजय आरेकर, सर्जेराव पाटील, दिनकर आडसूळ, रावण समुद्रे आदींनी विशेष परिश्रम घेतले असे, आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे