बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ठाण्याच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याची आयआयटी-मुंबईमार्फत होणार फेरआखणी,वाहतुकीच्या पुढील पाच वर्षांतील आव्हानांचा होणार अभ्यास…

अमित जाधव - संपादक

ठाणे (प्रतिनिधी ) :ठाणे महापालिकेतर्फे २०१८मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेश वाहतूक आराखड्याची आताच्या बदललेल्या स्थितीनुसार फेरआखणी करण्यात येणार आहे. आयआयटी, मुंबईच्या ‘जीआयएसई हब’च्या मदतीने फेरआखणीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

*मूळ आराखडा सन २०१८चा*

मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. २०१०पासून या आराखड्याचे काम सुरू करण्यात आले. २०१८मध्ये त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यात, मेट्रो मार्गांचे आरेखन, ठाणे पूर्व येथील सॅटीस प्रकल्प, ठाणे-मुलुंड दरम्यानचे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक, आनंद नगर ते साकेत कोस्टल रोड, भुयारी मार्ग आदींबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले होते.

महापालिका आयु्क्त सौरभ राव यांच्या दालनात, आयआयटी, मुंबईतील जीआयएसई हबचे प्रा. सुमीत सेन यांच्यासोबत यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे आणि भगवान शिंदे उपस्थित होते.

*वर्षभरात होणार फेरआखणी*

या आराखड्यातील तरतूदी आणि सद्यस्थिती तसेच भविष्यातील आव्हाने यांचा अभ्यास करून आराखड्याची फेरमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. २०१८मधील या आराखड्याची फेरमांडणी करून २०३०पर्यंतच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी, आयआयटी, मुंबईतील ‘जीआयएसई हब’ या विज्ञान आणि अभियांत्रिकी यांची सांगड घालणाऱ्या तज्ज्ञ गटांच्या मदतीने पुढील वर्षभरात फेरआखणीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

*फेरआखणीचा उद्देश*

शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याचा अभ्यास करणे, त्यात सुचवण्यात आलेल्या उपायांच्या अमलबजावणीचा आढावा घेणे आणि बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक ते उपाय व सूचना करणे हा या फेरआखणीचा मुख्य उद्देश आहे. आयआयटी, मुंबईतील ‘जीआयएसई हब’मधील तज्ज्ञ आणि अभ्यासक हे उपलब्ध माहिती, नव्याने प्राप्त झालेल्या अत्याधुनिक मॉडेल्सच्या मदतीने ही फेरमांडणी करणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

*याचा होणार अभ्यास*

ही फेरमांडणी करताना, त्यात वाहतुकीचे बदलेले पॅटर्न, शालेय बसेस तसेच इतर गाड्यांची वाढलेली वाहतूक, घनकचऱ्याची वाहतूक, बांधकामातील राडारोड्याची वाहतूक यामुळे वाहतुकीवर येणारा ताण याचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच, सायकल ट्रॅक, केवळ पादचारी वाहतुकीसाठीची व्यवस्था यांचाही विचार केला जाणार आहे. ठाणे शहरालगत असलेल्या खाडीचा जल वाहतुकीसाठी कसा उपयोग करता येईल याबद्दल त्यात अभ्यास करण्याची सूचना आयुक्त राव यांनी केली आहे.

मेट्रो, रेल्वेपर्यंत ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची रचना, पार्किंग व्यवस्था, तीन हात नाका येथील वाहतूक कोंडीबाबत सूचना यांचाही या फेरमांडणीत अभ्यास करण्यात येणार आहे.

*नागरिकांचा प्रतिसाद नोंदवणार*

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाने हा अभ्यास करण्यात येणार असून त्यासाठी गठीत करण्यात येणाऱ्या अभ्यास गटात, वाहतूक पोलीस, मेट्रो, एमएमआरडीए, रेल्वे, पर्यावरण विषयक तज्ज्ञ यांचाही सहभाग घेण्यात येईल, असे आयुक्त राव म्हणाले. तसेच, या फेरआखणीचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी नागरिकांचा प्रतिसादही जाणून घेण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे