वॉटर फ्रंट, कोस्टल रोड, मेट्रो, बुलेट ट्रेनबाधित भूमीपुत्रांची होतेय पिळवणूक, ठाणे शहर व परिसरातील भूमीपुत्रांना समृद्धीच्या धर्तीवर मोबदला देण्याची ओबीसी प्रतिष्ठानची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दि. 22 ः ठाणे शहरात सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. त्यामध्ये वॉटर फ्रंट, कोस्टल रोड, मेट्रो बाधित भूमीपुत्राची होतेय पिळवणूक आदी प्रकल्प एमएमएआरडीए, ठामपा आदी आस्थापनांकडून राबविले जात असताना यासाठी भूसंपादन करताना भूमीपुत्रांना दिला जाणारा मोबादला अगदीच तुटपुंजा असून यामुळे भूमीपुत्र देशोधडीला लागेल, अशी भीती व्यक्त करत समृद्धी महामार्गाच्या बाधितांना ज्या प्रमाणे मोबदला दिला गेला त्याच धर्तीवर ठाणे शहर व आसपासच्या प्रकल्प बाधित भूमीपुत्रांना मोबदला देण्याची मागणी ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
ठाणे शहर हे पाच पाखाड्या आणि विविध गावांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेआहे. या शहराच्या निर्मितीमध्ये या गावांमधील आगरी कोळी आणि आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. या समाजाने दिलेल्या जमिनींवरच शहर उभे राहिले आहे. सद्यस्थितीत ठाणे शहर आणि आजूबाजूचा परिसर हा अतिशय वेगवान पद्धतीने विकसीत होत आहे. मुंबईला पर्याय म्हणून ठाण्याकडे पाहिले जात असल्याने इथे रस्ते, रेल्वेमार्ग, मेट्रो सेंटर, एमआयडीसी, एमएमआरडीए, महापालिका सुविधा भूखंड, जलवाहिनी, वॉटर फ्रंट, कोस्टल रोड, मेट्रो कार शेड, रिंगरुट रेल्वे, मेट्रो कार शेड आदी विकासकामांसाठी भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. पैकी एमआयडीसी बंद झाल्याने हे भूखंड कारखानदारांनी विकून गडगंज पैसा कमावला आहे. पण, या जमिनीचे मूळ मालक हे कंगालच राहिलेले आहेत. तर, इतर प्रकल्पांसाठी जमीन घेतली जात असताना भूमिपुत्रांना टीडीआर देऊन शांत करण्यात येत आहेत. वास्तविक पाहता, त्याचा काहिही फायदा भूमिपुत्रांना होत नाही. त्यामुळे या बाबीचा विचार करून विविध विकासकामांत ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना ठामपा, एमएमआरडीए आस्थापनात नोकरी द्यावी आणि समृद्धी महामार्गातील बाधितांना जसा मोबदला देण्यात आला. तसाच मोबदला या भूमिपुत्रांना द्यावा, ही विनंती ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी दिलेल्या पत्रात केली आहे.



