आनंद दिघे टॉवरवरील घड्याळ ठप्प – केवळ पोस्टरबाजी करणाऱ्यांना ठाणेकर विचारतील, “धर्मवीर” कुठे हरवलेत:- रोहिदास मुंडे
अमित जाधव - संपादक

कल्याण, टेंभी नाका (ठाणे):धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामनात अढळ स्थान राखणारे लोकनेते. आज अनेकजण त्यांचं नाव वापरून राजकारण करतायत, पण प्रत्यक्षात त्यांच्या स्मृतींची, त्यांच्या नावाने उभारलेल्या टॉवरची स्थिती काय आहे, हे पाहायला कोण येत नाही.
टेंभी नाक्यावरील ‘आनंद दिघे टॉवर’ वरचं घड्याळ कित्येक महिन्यांपासून बंद आहे. हे केवळ एक घड्याळ नाही, तर ठाणेकरांच्या भावना, श्रद्धा, आणि दिघे साहेबांच्या आठवणी यांचं जिवंत प्रतीक आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यावर तीव्र निषेध व्यक्त करतो. असं कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे
पोस्टर लावणं, बॅनरबाजी करणं, वक्तव्य करून मथळे मिळवणं हे सोपं आहे; पण जेव्हा दिघे साहेबांच्या नावाने उभारलेल्या वास्तूची हेळसांड होते, तेव्हा ती लोकशाहीतील खर्या श्रद्धेची विटंबना आहे.
आमचा ठाम सवाल आहे की ठाणे महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे आजवर दुर्लक्ष का केले दिघे साहेबांचं नाव घेऊन सत्तेवर पोहोचलेले नेते आता या स्मारकाच्या देखभालीसाठी पुढे का येत नाहीत?
जर काही दिवसांत आनंद दिघे टॉवरवरील घड्याळ दुरुस्त न झालं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
ही मागणी केवळ एका घड्याळासाठी नाही – ही मागणी आहे त्या धर्मवीराच्या स्मृतींच्या सन्मानासाठी, ज्यांच्या विचारांनी अनेकांचे आयुष्य घडले. असे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे