रेल्वेच्या जमिनींवरील राहत असलेल्या रहिवाशांना दिल्या जाणाऱ्या नोटिसा थांबवा,रेल्वे राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेत केली मागणी…
अमित जाधव-संपादक
*रेल्वेच्या जमिनींवरील राहत असलेल्या रहिवाशांना दिल्या जाणाऱ्या नोटिसा थांबवा…*
*रेल्वे राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेत केली मागणी…*
रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे जमिनींवरील अनधिकृतपणे राहत असलेल्या नागरिकांना घरे खाली करण्याकरिता सातत्याने नोटीसा पाठवल्या जात असल्याच्या संदर्भात आज पुन्हा रेल्वे राज्यमंत्री मा.श्री. रावसाहेब दानवे यांची त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. मुंबई आणि उपनगरातील रेल्वेच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या प्रश्नांवर तोडगा काढल्याशिवाय त्यांना पुन्हा नोटिसा दिल्या जाणार नाहीत, असे आश्वासन दिले असतानाही पुन्हा रेल्वे प्रशासनाने नोटीस सत्र सुरू केले आहे. यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. ही बाब गंभीर असल्याचे सांगत नोटिसा अशाच येत राहिल्यास भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल असे यावेळी सांगत रेल्वे राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब दानवे यांना हजारो रहिवाशांच्या वतीने निवेदन देत रेल्वे प्रशासनाच्या वतीने पाठविण्यात येत असलेल्या नोटीसा थांबवण्याची विनंती केली.
सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई सह देशभरातील रेल्वे जमिनींवरील अनधिकृतपणे राहत असलेल्या लाखोंनी नागरिकांना रेल्वे प्रशासनाच्या वतीने या जमिनी तातडीने रिक्त करण्याच्या नोटीसा धाडण्यात आल्या होत्या. त्यावेळी तातडीने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत रहिवाशांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. गेली ४० ते ५० वर्षे व त्याहूनही अधिक काळ या जमिनीवर राहत असलेल्या रहिवाश्यांचे पुर्नवसन न करता वाऱ्यावर सोडता कामा नये, यासाठी आग्रही राहून पाठपुरावा करत होतो. यासंदर्भातच मुंबई येथे रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रदेश विभागातील खासदार आणि आमदारांची बैठक झाली होती. त्यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार, रेल्वे प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांची एकत्रितपणे योजना राबवून या नागरिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी मान्य करत तोपर्यंत या रहिवाशांना जमिनी रिकाम्या करण्यासाठी नोटीसा पाठवू नये ही मागणी रेल्वे राज्यमंत्र्यांनी स्वतः मान्य केली होती. मात्र असे असताना गेल्या काही दिवसांपासून पुन्हा रेल्वे प्रशासनाकडून या रहिवाशांना नोटीसा पाठवल्या जात आहेत.
या नोटीसांमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली असून सध्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने ऐन परिक्षा काळात घराचे छत्र हरवण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हे नोटीस सत्र असेच सुरू राहिल्यास मुंबई आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती उदभवल्यास त्याला सर्वस्वी रेल्वे मंत्रालय जबाबदार राहील, असे सांगत तातडीने रेल्वे प्रशासनाकडून पाठवण्यात येत असलेल्या या नोटिसा थांबवाव्यात आणि जोपर्यंत यावर धोरण निश्चित होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये अशी विनंती यावेळी रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे यांना केली.