
ठाणे ता १ जून : मुंबईतील मिठी नदीचा गाळ दिवा-मुंब्र्यात टाकणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून मे महिन्यातच सुरू झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यातील गाळ निर्माण झाल्याने मुंबईतील डंपिंग ग्राउंडवर पाणी साचून दलदलीमुळे त्या ठिकाणी गाळ वाहून नेणारी वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे गाळ वाहून नेणारे डंपर चालक त्या ठिकाणी वाहने नेण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता गाळ टाकण्यासाठी मुंबई महापालिकेने नव्या जागेचा पर्याय निवडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून मुंबईतील मिठी नदीतील गाळ महापे डंपिंग ग्राउंडऐवजी दिवा-मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकण्यात येणार आहे.
प्रकरणी मिठी नदीच्या साफसफाईसाठी तीन भागांमध्ये विभागून कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदारांची निवड झाल्यानंतर गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली. गाळ बाजूला काढल्यानंतर तो पूर्णपणे सुकला की त्याची नोंद करून डंपरद्वारे महापे येथील डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाने तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे गाळ वाहून नेणारी वाहने तेथे रुतून बसण्याचे प्रकार घडू लागले आहेत. परिणामी डंपर चालक गाळ नेण्यास टाळाटाळ करत आहेत. अशात मिठीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर गाळ पडून आहे. मोठ्या पावसाला सुरुवात झाल्यास हाही गाळ पुन्हा नदीत वाहून जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्याची तत्काळ विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मिठी नदीच्या गाळामुळे दिवा मुंब्य्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. हा गाळ नेमका कुठे टाकणार याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मिठी नदीच्या गाळामुळे दिवा-मुंब्य्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.