दिवा विभागातील रस्त्यांवरील अनधिकृत हातगाड्यांविरोधात ठाणे महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा निषेध…
अमित जाधव - संपादक

दिवा – दिवा विभागातील नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही ठाणे महानगरपालिका रस्त्यांवरील अनधिकृत हातगाड्यांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या हातगाड्यांमुळे सार्वजनिक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असून, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहतूक पार करावी लागत आहे. ही परिस्थिती भारताच्या संविधानातील अनुच्छेद 21 (जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क) आणि अनुच्छेद 19(1)(d) (मुक्तपणे वावरण्याचा हक्क) यांचे सरळ उल्लंघन आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 244 व 245 नुसार सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवणे आणि अतिक्रमण हटवणे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. पण तरीही महानगरपालिका या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे.
या संदर्भात आयुक्तांना निवेदन दिले असून, 7 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांच्याकडून देण्यात आला आहे.
दिवा विभागातील नागरिक आता न्यायासाठी संघटित होत असून, महानगरपालिकेच्या प्रशासनाला जर वेळेत जाग न आली, तर याचे पडसाद संपूर्ण ठाणे शहरात उमटतील असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे