
दि. ०७ , (ठाणे)- ठाणे जिल्ह्यातील सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी२०२५ व बारावी बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत ‘कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तरी विद्यार्थ्यांनी या परीक्षेस सामोरे जाताना कॉपीमुक्त परीक्षा व भयमुक्त परिक्षेस सामोरे जावे, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव तथा पालक सचिव , ठाणे जिल्हा सुजाता सौनिक व दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
जिल्ह्यात दहावी करिता ३३८ परीक्षा केंद्र असून १ लाख ३ हजार ७१८ तर बारावी परीक्षा करिता १९७ परीक्षा केंद्र असून १ लाख २१ हजार २४४ विद्यार्थ्यी परिक्षेस प्रविष्ठ होत आहेत. परीक्षा कामकाज २० परिरक्षक केंद्रामार्फत होणार आहे.
शिक्षण विभागाच्या अंतर्गत भरारी पथक व आवश्यकतेप्रमाणे बैठे पथक नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तालुका व मनपा स्तरावरून स्वतंत्रपणे भरारी व बैठे पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भरारी पथके नेमण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख यांनी परीक्षा केंद्राना भेटी देण्यासंदर्भांत नियोजन करण्यात आले आहे.
परिक्षादरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तरी विद्यार्थी व पालकांनी दक्षता घ्यावी तसेच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायम स्वरुपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या आहेत.
तसेच परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक व पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेसियल उपस्थिती घेण्यात येणार आहे.
*‘कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून खालील बाबीची दक्षता घेण्यात येणार आहे*
१. जिल्ह्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराव्दारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल.
२. परीक्षा सुरू होण्याअगोदर परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध असण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे
३. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यकतेनुसार व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल.
४. जिल्हयातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व आवश्यकतेप्रमाणे बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात आले आहे
५. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे
६. परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात आवश्यकतेप्रमाणे १४४ कलम लागू करण्यात येईल.
परीक्षेशी संबंधित घटकांनी नियमबाह्य पद्धतीने मोबाईल अथवा तत्सम इलेक्ट्रॉनिक्स् उपकरणे परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जाऊ नयेत.परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे. अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी व पालक यांना इयता दहावी व बारावी परीक्षेसाठी राज्याच्या मुख्य सचिव तथा पालक सचिव ठाणे जिल्हा सुजाता सौनिक व जिल्हा प्रशासनाकडून शुभेच्छा!!
000