९२ नगरपालिका आणि चार नागरपंचायतींची निवडणूक स्थगित, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय….
अमित जाधव-संपादक
९२ नगरपालिका आणि चार नागरपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली आहे. अतिवृष्टी आणि इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण या मुद्दय़ांवर लांबणीवर टाकण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विनंती, तसेच सत्ताधारी आणि विरोधकांच्या मागणीनंतर राज्य निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका स्थगित करण्याची घोषणा आयोगाने केली आहे.
इतर मागासवर्ग (ओबीसी) समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींसाठी १८ ऑगस्टला निवडणूक होणार होती. राज्य निवडणूक आयोगाने तशी घोषणा केली होती. मात्र निवडणुका होणार असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण लागू नाही. यामुळेच या निवडणुकांचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्याची मागणी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी केली होती.


