बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

संपत्तीच्या वादातून मुलाने केली वडिलांची हत्या…

अमित जाधव-संपादक

ठाणे – वडिलांनी दुसरे लग्न करून संपत्तीमध्ये हिस्सेकरी वाढवला. त्यातच मुलाने वडिलांकडे संपत्तीचा हिस्सा मागितला असता वडिलांनी नकार देत मुलालाच घराच्या बाहेर काढले. याचाच राग मनात धरून वडिलांवर धारदार चाकूने वार करत मुलाने हत्या करुन फरार झाला. ही धक्कादायक घटना मुरबाड तालुक्यातील डोंगर नवले गावात घडली आहे. याप्रकरणी मुरबाड तालुका पोलीस ठाण्यात मुलावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मंगल हरी शेळके (वय ५० वर्ष) असे हत्या केलेल्या वडिलाचे नाव आहे. रवी मंगल शेळके (वय, ३५ वर्ष ) असे हत्या करून फरार झालेल्या मुलाचे नाव आहे.
मृतक मंगल शेळके मुरबाड तालुक्यातील डोंगर नवले गावाचे रहिवाशी आहे. तर आरोपी मुलगा हा पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. मात्र मृत मंगल यांनी दुसरे लग्न केले. तसेच गेल्या पाच वर्षांपासून वडील व आरोपी मुलामध्ये संपत्तीच्या वादातून वारंवार भांडणे होत होते. त्यामुळे वडीलानी आरोपी मुलाला घराबाहेर काढून संपत्तीमध्ये वाटा मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलगा रवी काल रात्रीच्या सुमारास वडिलांच्या घरी येऊन संपत्तीचा वाद उकरून काढत पुन्हा वाद घातला. मात्र यावेळी हा वाद एवढा विकोपाला गेला की, मुलगा रवीने वडिलांवर धारधार चाकूने वार करून त्यांच्या राहत्या घरातच हत्या केली. वडील रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडल्याचे पाहून आरोपी मुलाने घटनास्थळावरून पळ काढला.

फरार मुलाच्या शोधात पोलीस पथक रवाना घटनेची माहिती मुरबाड पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत मंगलचा मृतदेह मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर हत्येप्रकरणी भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करीत फरार मुलाचा पोलिसांनी शोध सुरु केल्याची माहिती मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे