बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अखेर कळवा खारीगाव उंडाणपुल झाला वाहतुकीसाठी सज्ज, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन…..

अमित जाधव-संपादक

कळवा खारीगाव उंडाणपुलाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन…..

*२२वर्षाच्या प्रतिक्षे नंतर अनेक अडचणींवर मात करत उडानपुल पूर्णत्वास आला-मंत्री जितेंद्र आव्हाड

 

ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने खारेगांव येथील लेव्हल क्रॉसिंग येथे बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शुभहस्ते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. खारेगांव उड्डाणपुलासाठी जागा हस्तांतरण करणे, पुलाच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यात ठाणे महानगरपालिकेचा वाटा हा महत्वाचा आहे. नागरिकांचे जीव वाचावेत यासाठी रेल्वेपुलासाठी निधी उपलब्ध करुन देणारी ठाणे ही देशातील पहिली महानगरपालिका असल्याचे उद्गगार श्री.शिंदे यांनी यावेळी काढले. धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपूल या नावाने हा पूल ओळखला जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमास उप महापौर सौ. पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रियांका पाटील, कळवा प्रभाग समिती अध्यक्षा सौ. वर्षा मोरे, नगरसेविका ऍड. सौ. अनिता गौरी, सौ. विजया लासे, मंगल कळंबे, आरती गायकवाड, सौ. अपर्णा साळवी,प्रमिला केणी, नगरसेवक गणेश कांबळे, उमेश पाटील, महेश साळवी, प्रकाश बर्डे, राजेंद्र साप्ते, सुधीर कोकाटे अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, नगर अभियंता अर्जुन अहिरे,उप अभियंता प्रवीण पापळकर, कार्यकारी अभियंता मोदे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
कळवा खारेगांवचा विकास हा खऱ्या अर्थाने २००९ पासून झाला, कळवा पूर्व भागात नागरिकांसाठी सुस्थितीतीत रस्ते, पाणी या गोष्टीमिळाल्या, खारेगांव उड्डाणपुल तयार होण्यासाठी अनेक अडचणी आल्या, परंतु त्या सर्व अडचणींवर मात करीत आज हा पूल तयार झाला असून ठाणे महापालिकेने कळवा खारीगांवमध्ये केलेल्या विकासकामांचे राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केले.
गेली २२ वर्षे हा प्रश्न रखडला होता, यासाठी रेल्वे व महानगरपालिका यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करुन आज हा उड्डाणपूल पुर्णत्वास गेला आहे. या रेल्वेपुलासाठी ठाणे महानगरपालिकेने केलेली मदत ही निश्चितच कौतुकास्पद असून त्यामुळेच हे काम लवकर पूर्ण झाले असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले.

खारीगांव रेल्वे पूल हा रेल्वे व महानगरपालिका यांच्या सहकार्यामुळे जरी तयार झाला असला तरी या पुलासाठी सर्व नगरसेवक, आमदार, खासदार यांनी देखील वारंवार पाठपुरावा करुन महापालिकेला सहकार्य केले त्याबद्दल महापौर नरेश म्हस्के यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच या उड्डाणपुलाला धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपूल हा नामकरणाचा प्रस्ताव येत्या सर्व साधारण सभेत मंजुरीसाठी येणार असून तो ही एकमताने मंजूर होईल असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला.

ठाणे महानगरपालिका व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विदयमाने मध्य रेल्वेच्या लेव्हल क्रॉस क्र. २८ / सी या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पूलाची एकूण लांबी ६४१ मी इतकी असून रुंदी ११.३० मी. इतकी आहे. यापैकी रेल्वे लाईनवरील ६३ मीटर लांबीच्या पूलाचे काम रेल्वे विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे हद्दीबाहेरील पूर्व आणि पश्चिम बाजूकडील उन्नत जोडरस्त्यांचे काम महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या उड्डाणपूलाच्या पूर्व बाजूकडील पूलाची लांबी ३०८.०० मीटर, पश्चिम बाजूकडील पूलाची लांबी २७०.०० मीटर तर पूलाची रुंदी ( वाहनांकरिता ) ७.५० मीटर आहे. रेल्वेलाईन ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांसाठी पूर्व व पश्चिम भागामध्ये जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पादचाऱ्यांसाठी रेल्वे लाईन ओलांडण्यासाठी दोन्ही बाजुस पादचारी पुलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर प्रकल्पासाठी रेल्वे पुलासह ३८.९४ कोटी इतका खर्च आलेला आहे. महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या कामाचा एकूण खर्च २७.३४ कोटी सदर उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले असून आजपासून रेल्वे लाईनवरील उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे