द्रौपदी मुर्मुचां थक्क करणारा प्रवास……
अमित जाधव-संपादक
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी विजय मिळवला आहे. तर, विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षांशिवाय इतर राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्यानं द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता. अपेक्षेप्रमाणं द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला असून त्या भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून २५ जून रोजी शपथ घेतील. सामान्य आदिवासी कुटुंबात जन्म झालेल्या द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदापर्यंतचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनात २००९ ते २०१२ च्या दरम्यान दु: खद घटना घडल्या होत्या. मुर्मू यांनी दोन मुलांना गमावलं, दरम्यानच्या काळात पतीचं देखील निधन झालं होतं.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये झाला. मुर्मू या ओडिशा जिल्ह्यातील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्त्व करतात. द्रौपदी मुर्मू यांना तीन मुलं होती, त्यांच्या जीवनात २००९ मध्ये एक वादळ आलं. या वर्षात त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. यानंतर मुर्मू यांचे पती श्याम चरण मुर्मू यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. एक मुलाच्या आणि पतीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असताना २०१२ मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचं अपघाती निधन झालं. दोन मुलं आणि पतीच्या मृत्यूनंतर त्या पूर्णपणे कोसळल्या होत्या. पण, या सर्वातून सावरत त्यांनी संकटातून बाहेर येण्याचा मार्ग शोधला.
नगरसेवक ते राष्ट्रपती राजकीय प्रवास
सरकारी कार्यालयात त्या लेखनिक मधून कार्यरत होत्या. मुर्मू यांनी मोफत अध्यापनाचं काम केलं त्यानंतर त्या राजकारणात आल्या. द्रौपदी मुर्मू यांनी नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली. रैयरंगपूरच्या उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू २००० आणि २००९ मध्ये विजयी झाल्या. भाजपमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. ओडिशातील रैयरंगपूर विधानसभा मतदारसंघातून दोनदा भाजपच्या आमदार झाल्यानंतर मंत्री म्हणून देखील काम केलं. त्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने त्यांना २०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून निवडलं होतं. मागील वर्षी २०२१ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला.भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी २०१३ त २०१५ मध्ये काम केलं आहे. भाजपमध्ये द्रौपदी मुर्मू यांनी विविध पदांवर काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी काँग्रेसच्या सरकारच्या काळात प्रतिभाताई पाटील यांनी २००७ ते २०१२ मध्ये राष्ट्रपती म्हणून काम केलं होतं.


