ब्रेकिंग
दिवा शहरात महायुतीचा मेळावा उत्साहात संपन्न, येत्या १० वर्षात दिव्यात कोणती काम केली हे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी मेळाव्यात ठामपणे सागितले..
अमित जाधव - संपादक
कल्याण लोकसभेतील दिवा शहरात आज महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहून महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. देशाचं नेतृत्त्व निवडण्यासाठी ही निवडणूक आहे. रेल्वेच्या सुविधा पाहता दिव्यासारख्या स्टेशनचा कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारने केलं, असं याप्रसंगी ठामपणे त्यांनी सांगितलं. गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामं झाली. रिझर्वेशन काऊंटर, पाचवी सहावी लाईन, दिव्यात फाटक बंद करून उड्डाणपूल उभारणे अशी कामे मागच्या १० वर्षात केल्याचं सांगत दिव्यातले १० वर्षांपूर्वीचे रस्ते आणि आजचे रस्ते यात मोठा फरक आहे. १० वर्षात दिव्यातली परिस्थिती बदलली असून महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळेच हे शक्य झाले. दिवा रेल्वे स्थानकात कोकणात जाणारी प्रत्येक गाडी थांबवण्यासह दिवा सीएसटी फास्ट लोकल, एसी लोकल सुरू करण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहे. तसेच दिव्यातलं डम्पिंग बाहेर नेण्याचा शब्द पूर्ण केला असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले तसेच मुंब्रा वाय जंक्शन पूल, ऐरोली काटई मार्ग, मुंब्रा उड्डाणपूल यामुळे प्रवास देखील वेगवान झाल्याचं पाहण्यात येत आहे. ही मोठ्या प्रमाणात झालेली कामं लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला पुन्हा एकद नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, शिवसेनेचे राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी, ब्रह्माशेठ पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आरपीआयचे ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, साहेबराव सुरवाडे , दिवा भाजप अध्यक्ष सचिन भोईर,महीला अध्यक्षा सपना भगत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.