
पोलीस मित्र’ म्हणजेच ‘लोकचळवळीतून लोकसहभाग’ उभा करणारा एक उपक्रम आहे. त्यामुळे सर्व लोकांना बरोबर घेत या उपक्रमाची सुरूवात झाली. या उपक्रमांतर्गत सायबर क्राईम, महिला सुरक्षितता, अॅन्टी नाकोटिक्स, ट्रॅफिक मॅनेजमेंट व रोड सेफ्टी अशा विविध समाजिक प्रश्नांविषयी जनजागृती करून त्यामध्ये विद्यार्थ्यांना थेट सहभागाचे म्हणजेच ‘पोलीस मित्र’ होण्याचे आवाहन करण्यात आले.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनमधील तसेच शहर वाहतूक शाखेतील सर्व वरिष्ट पोलीस निरीक्षक यांनी सदर उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊन ४० पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांना ‘पोलीस मित्र’ या उपक्रमाचे महत्व पटवून दिले व त्यामुळेच २४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी, सामाजिक संस्थाच्या सदस्यांनी तसेच महिलांनी स्वयंस्फूर्तीन ‘पोलीस मित्र’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयातील ३५ पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा व ईगल ब्रिगेड फाउंडेशन यांच्या सहाकार्यातून उभा राहिलेला हा उपक्रम आतापर्यंत जवळपास ४० महाविद्यालयांमध्ये राबविला गेला असल्याने याव्दारे ५००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांमध्ये सायबर काईम, महिला सुरक्षितता, अँटी नार्कोटिक्स, ट्रॅफिक मॅनेजमेंट व रोड सेफ्टी अशा विविध सामाजिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यात आली आहे. महाविद्यालयांबरोबरच अनेक सामाजिक व अध्यात्मिक संस्थांना देखील या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. संबंधित संस्थांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
७ सप्टेंबर २०२४ ते १७ सप्टेंबर २०२४ या गणेशोत्सवाच्या कालावधीदरम्यान विसर्जनाच्या विविध दिवशी ‘पोलीस मित्र’ उपक्रमांतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन मधील विविध गणेश घाटांवर तसेच कृत्रिम तलावांवर ‘क्राऊड व ट्रॅफिक मैनेजमेंट’ करण्यात आले. या दहा दिवसांमध्ये पोलीस मित्रांनी लक्षणीय सहभाग नोंदवला.
अशा प्रकारे समाजातील सर्व घटक जसे विद्यार्थी, महिला, तरूण वर्ग, स्वयंसेवी संस्थाचे सदस्य या सर्वांना सोबत घेत खऱ्या अर्थाने ‘लोकचळवळीतून लोकसहभाग’ उभा करणारा ‘पोलीस मित्र, कम्युनिटी पोलिसिंग’ उपकम येथून पुढेही अशीच वाटचाल करत राहणार असून समाजास जागृत करून जास्तीत जास्त सामाजिक विकास साधण्याचा ठाणे पोलीस आयुक्तालयाचा मानस आहे.