दिव्यातील सर्वच पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या आहाराची तपासणी करा – ज्योती पाटील
अमित जाधव - संपादक
दिवा:- दिव्यातील महापालिका व मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा तपासण्यात यावा ,तसेच लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने ज्योती राजकांत पाटील यांनी अन्न व औषध पुरवठा आयुक्तांकडे केली आहे.
अन्न व औषध पुरवठा आयुक्त व पालिका शिक्षण विभाग यांना दिलेल्या लेखी निवेदनात शिवसेना दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी म्हटले आहे की, दिवा शहरात महापालिका शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मुलांना दिले जात असल्याचा प्रकार आम्ही अलीकडेच उघडकीस आणला. लहान मुलांच्या आरोग्याची खेळणाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे.याचबरोबर आपण दिवा शहर, त्याचबरोबर लगतच्या ग्रामीण भागातील सर्व महापालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या शालेय जेवनाचा दर्जा तपासावा अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी महापालिका व मराठी शाळांमध्ये शिक्षण घेत असतात. त्यांच्या आरोग्याशी संबंधित ठेकेदारकडून खेळण्याचा प्रकार होत असेल तर त्याला वेळीच पायबंध घातला पाहिजे. म्हणून ग्रामीण क्षेत्रातील सर्वच महापालिका शाळा, जिल्हा परिषद शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या दर्जाची आपण चौकशी करावी व चांगल्या दर्जाचे जेवण या विद्यार्थ्यांना दिले जात आहे का?याची तपासणी विशेष पथक नेमून करावी अशी मागणी ज्योती पाटील यांनी या पत्राद्वारे केली आहे.