दिव्यातील सर्वच प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर डांबरी गतिरोधक बसवा दिवा मनसेचे ठाणे महानगरपालिकेला निवेदन..
अमित जाधव - संपादक
दिवा शहरातील काँक्रेटिकरण झालेल्या रस्त्यांवरून वाहनचालक बेदरकारपणे आणि वेगाने गाड्या हाकताना दिसून येतात. दिव्यात यापूर्वीही अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेकडून रबरी गतिरोधक काही ठिकाणी लावण्यात आले होते. पण हे सर्व गतिरोधक आता तुटलेल्या अवस्थेत आहे. बहुतांश वेळा वाहनचालक मुद्दाम हे रबरी गतिरोधक तोडून टाकतात.
दोन दिवसांपूर्वी समर्थ नगर मधील मोरेश्वर कॉम्प्लेक्स समोर दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला ज्यात दुचाकीस्वार आणि रस्त्यावरून जाणाऱ्या दोन तरुणीही गंभीर जखमी झाल्या. यामुळे भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिव्यातील ग्लोबल स्कुल ते दातीवली फाटक पर्यंतच्या रस्त्यावर महापालिकेकडून डांबरी गतिरोधक बनवण्यात आलेले आहेत, त्याच धर्तीवर दिव्यातील इतर सर्व प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर डांबरी गतिरोधक उभारण्यात यावेत असे पत्र दिवा मनसेकडून देण्यात आले आहे.