शरद पवारांच्या पुस्तकातील ते वाक्य जिव्हारी लागलं, उद्धव ठाकरे ‘सामना’तून प्रत्युत्तर देणार…
अमित जाधव - संपादक
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी काहीसा नापसंतीचा सूर लावला होता. शरद पवार यांचे हे वक्तव्य उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याचे समजत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे लवकरच शरद पवार यांची ही टीका खोडून काढण्यासाठी या मुद्द्यावर सविस्तर भाष्य करण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फक्त दोनवेळा मंत्रालयात गेले. ही बाब आमच्या फारशी पचनी पडणारी नव्हती, असे शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली होती.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी उद्धव ठाकरे या सगळ्या आरोपांना लवकरच प्रत्युत्तर देतील, असे संकेत दिले. लोक दोन दिवस पुस्तक वाचतात, त्यानंतर ते ग्रंथालयात जातं. उद्धव ठाकरे लवकरच दैनिक सामनाला मुलाखत देत आहेत. तेव्हा त्यांच्याविषयी आणि शिवसेनेविषयी करण्यात आलेल्या भाष्याबाबत उद्धव ठाकरे उत्तर देतील. उद्धव ठाकरे हे फक्त दोनवेळाच मंत्रालयात गेले, ही माहिती चूक आहे. ते सातत्याने मंत्रालयात जात होते. फक्त करोनाच्या काळात त्यांचं मंत्रालयात जाणं कमी झालं. केंद्र सरकारनेच तसे आदेश दिले होते. या काळात नरेंद्र मोदीही पंतप्रधान कार्यालयात जात नव्हते. अनेक केंद्रीय मंत्री आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही ‘वर्क फ्रॉम होम’ करत होते, असे सांगत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू लावून धरली.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
‘मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या शर्ट, पँट अशा मुंबईकर मध्यमवर्गीयांच्या पोशाखात सहजपणे वावरण्याचे एक अप्रुप सर्वांनाच होते. करोना महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकवर साधलेला सहज संवाद मध्यमवर्गीयांना भावला. त्यांना सहकार्य केले पाहिजे, असे या वर्गाला वाटत होते. मंत्रालयाच्या प्रशासकीय वर्गातही त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना होती. या झाल्या उद्धव यांच्या जमेच्या बाजू. मात्र, उद्धवना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्रालयात फक्त दोनदा जाणे, आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते’, असे पवार यांनी आत्मकथेत पान क्रमांक ३१८वर नमूद केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपच्या उंबरठ्यावर: संजय राऊत
संजय राऊत यांनी गुरुवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीविषयी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य केले. यामध्ये राऊतांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो. अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे पाऊल उचलले आहे काय?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे