मुंबई प्रेस क्लब येथे बी एस पी ची पत्रकार परिषद,राष्ट्रीय समन्वयक श्री आकाश आनंद यांच्या उपस्थितीत ‘शासक बनो’ अंतर्गत ‘पोलिंग बूथ ते पार्लियामेंट’ या अभियानास प्रारंभ होणार
अमित जाधव - संपादक
राष्ट्रीय समन्वयक श्री आकाश आनंद यांच्या उपस्थितीत ‘शासक बनो’ अंतर्गत ‘पोलिंग बूथ ते पार्लियामेंट’ या अभियानास प्रारंभ होणार
मुंबई,
गेली अनेकवर्षे फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेऊन राज्यातील बहुजन समाजाच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकण्याचे काम येथील राज्यकर्ते आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने करीत आलेले आहेत. याला आव्हान देत शासक बनो चा नारा देत बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात आपलं पोलिंग बूथ ते पार्लियामेंट हे अभियान सुरू करत आहे. महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टीला सातत्याने चांगले मतदान होत आहे, या मतदानाचे रूपांतर विजयामध्ये करून महाराष्ट्राची सत्ता मिळवण्याचा संकल्प या अभियानात करण्यात येणार आहे. बसपाच्या अध्यक्षा सुश्री मायावतीजींच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक श्री आकाश आनंद यांच्या उपस्थितीत अभियान सुरू होईल अशी माहिती पक्षाचे मा.खा. तथा केंद्रीय समन्वयक अशोक सिद्धार्थ जी, केंद्रीय समन्वयक नितिन सिंहजी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांनी दिली आहे.
महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. परंतु पुरोगामित्वाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये आजतागायत फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे कृतिशील सरकार निर्माण झालेले नाही, हे चित्र बदलण्यासाठी बहुजन समाज पार्टीने आता शासक बनो चा नारा दिला आहे, अशी माहिती अशोक सिद्धार्थ, नितिन सिंहजी आणि संदीप ताजने यांनी दिली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि भाजपा, मनसे हे सर्वच पक्ष इथल्या बहुजन समाजाच्या हिताच्या विरोधात आहेत. बहुजनांच्या विकास मार्गातील हे अडथळे आहे. कारण जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षाचे सरकार येथील जनतेच्या हातातील रोजगार हिसकावते, जनता करीत असलेली काम हिरावून घेते, जनतेला मिळत असलेल्या संधी नाकारते, जनतेसाठीचे आरक्षण धुडकावते , तेव्हा मात्र भारतीय जनता पक्ष विरोध करीत असल्याचा कांगावा करतो. याउलट जेव्हा भाजपाचे सरकार सत्तेत असते तेव्हा मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ही मंडळी बेबनाव करतात, असा घणाघाती आरोप संदीप ताजने यांनी केला आहे.
मुंबई येथील प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्री संदीप ताजने यांनी देशासमोरील ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधले. आज राज्यातच नाही, तर अवघ्या देशभरात महागाईने उच्चांक गाठला आहे. उद्योगधंदे संपुष्टात आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. आपल्या तरुणांच्या हाताला काम नाही, अवकाळी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मध्यमवर्गीय माणसाचे कंबरडे महागाईने मोडले आहे, गरीबवर्ग हा देशोधडीला लागला आहे. ‘गॅस हजार पार आणि रुपया डॉलरपुढे बेजार’ अशी परिस्थिती असताना, मात्र जनसामान्यांच्या प्रश्नांना बगल देऊन वैयक्तिक चिखलफेक करून सत्ताधारी आणि विरोधक राजकीय धुळवड साजरी करण्यात धन्यता मानत आहेत. सत्ता आणि पैसा याचा अमाप वापर करून ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ असा ‘खोक्या आणि बोक्यांचा खेळ रंगला आहे, मात्र यात सर्वसामान्यांच्या जीवनाचे कुणालाही सोयर-सुतक उरलेले नाही.
एकीकडे सततच्या संकटाने राज्यातील शेतकरी, कष्टकरी यांना आम्ही तुमच्या दुःखात सामील आहोत असा खोटा कळवळा दाखविण्याचा प्रयत्न विरोधी बाकावरचा पक्ष करतो आहे, तर दुसरीकडे भाजप आणि नव्याने जन्माला आलेली शिवसेना ही शेतकरी, कष्टकरी जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करते आहे. अशावेळी शेतकरी, कष्टकरी जनतेच्या दैनंदिन जगण्याचे प्रश्न असो, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो, शिकलेल्या युवक-युवतींच्या रोजगारीचा प्रश्न असो कि महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला वळते करण्याचा प्रश्न असो, प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, सामन्यांचा आवाज बनवण्यासाठी बहुजन समाज पार्टी सर्वसामान्यांच्या सोबत आहे, अशी माहिती ही श्री ताजने यांनी दिली.
सध्याचे ईडी सरकार आणि मागचे महाविकास आघाडीचे सरकार असे सगळे पक्ष मिळून महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरत आहेत, या राज्यकर्त्यांना जनसामान्यांच्या प्रश्नाशी काही देणे घेणे नाही. आज देशाचा विचार करता, केंद्रातील दोन गुजराती देश विकत आहेत आणि दोन गुजराती देश विकत घेत आहेत. हा जो ‘हम दो हमारे दो’ संकल्प भाजपने देशात सुरु केला आहे, याचा पर्दाफाश करण्यासाठी बहुजन समाज पार्टी ९ नोव्हेंबरनंतर संपूर्ण राज्यात व्यापक स्वरूपात जन आंदोलन उभे करणार आहे, अशी आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
बहुजन समाज पार्टी ही बहुजन-दलित-आंबेडकरी समाजातील एक विश्वासार्ह आणि आश्वासक राजकीय पार्टी आहे. सन २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात मोठी पार्टी होती. सन २००४, २००९ आणि २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून बहुजन समाज पक्षाला जनतेचा कौल मिळालेला आहे. मात्र सन २०१९च्या निवडणुकीमध्ये लोकांनी भावनिक लाट निर्माण करून लोकांना संभ्रमित करण्याचे काम केले. त्याचीच परिणीती बहुजन जनतेला सत्तेपासून वंचित ठेवण्यामध्ये झाली. ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा आणि शासक बनायला निघालेल्या समाजाला वंचितच ठेवण्याचा कट राज्यात शिजतोय, हा कट बसपा उधळून लावेल असा इशारा ही श्री ताजने यांनी दिला आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशामध्ये लोकशाही व्यवस्था निर्माण करून राजेशाहीचे समूळ उच्चाटन केलेले आहे. त्यामुळे बहुजन वर्गाला शासक बनण्याचा राजमार्ग संविधानाने खुला करून दिलेला आहे. त्यामुळे बहुजन समाज पार्टी आगामी काळामध्ये बहुजन वर्गाला, वंचित घटकाला सत्तेपासून दूर न ठेवता शासक बनण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहिलेली आहे. मान्यवर साहेब कांशीराम जी म्हणाले होते, जर उत्तरप्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यात सत्तेच्यामाध्यमातून बहुजन वर्गाचे भले होऊ शकते, तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही. म्हणून बहुजन समाज पार्टीने ‘होऊ शकत है’ अर्थात ‘होऊ शकत आहे’ या अभियानांतर्गत ‘शासक बनो’ या राजस्तरीय संमेलनाचे आयोजन मुंबईतील षण्मुखानंद सभागृह, माटुंगा येथे ९ नोव्हेंबर २०२२ केले आहे.
यामाध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला आंबेडकरी आणि बहुजन समाजाला शासक बनण्याच्या दृष्टिकोनातून कृतिशील कार्यक्रम देण्यासाठी आणि त्याची पूर्व तयारी करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक श्री आकाश आनंद जी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच आगामी महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हापरिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका बहुजन समाज पक्ष स्वबळावर लढविण्याच्या दृष्टीने पक्ष संघटनेची समीक्षा सुरु आहे. येत्या काळात पक्षात ५०% युवकांना प्रतिनिधित्व देण्यात येत आहे. ‘पोलिंग बूथ ते पार्लिमेंट’ शासक बनो या महाराष्ट्रातील अभियानाचा प्रारंभ देखील यावेळी होणार आहे, अशी माहिती बहुजन समाज पक्षाचे मा.खा. तथा केंद्रीय समन्वयक अशोक सिद्धार्थ जी, केंद्रीय समन्वयक नितिन सिंहजी संदीप ताजने यांनी दिली आहे.