कांदळवन नष्ट करून भराव टकणाऱ्यांची अशी करा तक्रार,ठाणे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून टोल फ्री क्रमांक सुरू….
अमित जाधव - संपादक
ठाणे, दि. 17 (प्रतिनिधि) : कांदळवनाचे प्रभावीपणे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी 1800-22-0002 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तक्रारी स्विकारणे व तक्रारीचे निवारण होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्याबाबतच्या सूचना नुकत्याच विभागस्तरीय बैठकीत देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कांदळवन संरक्षण व संवर्धन संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. तसेच कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने तसेच कांदळवनाच्या ऱ्हासाबाबत जिल्हास्तरावर तक्रारी दाखल करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1800-22-0002 हा टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील खाडी किनारी असणाऱ्या कांदळवन क्षेत्रात कांदळवनांची झाडे तोडली जात असतील, त्या ठिकाणी भराव केला जात असेल, कांदळवन रोपांची कत्तल केली जात असेल, पाणथळ जागांवर भराव ला जात असेल तसेच संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या जर काही तक्रारी असतील तर त्यांनी वरील नमूद क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.



