सात जन्म अशी पत्नी नको,पत्नीपीडित पुरुषांचे पिंपळाच्या वृक्षाला उलटे सात फेरे….
अमित जाधव-संपादक
औरंगाबाद येथील वाळूज परिसरातील एका पत्नीपीडित आश्रमात पुरुषांकडून दरवर्षी पिंपळपौर्णिमा साजरी केली जाते. यंदाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला १०८ फेऱ्या मारत पुढील ७ जन्म काय ७ सेकंदसुद्धा अशी बायको नको, अशी प्रार्थना केली.“आपली पत्नी आपल्याला सांभाळून घेईल या आशेने आम्ही लग्न केलं. पण लग्न झाल्यानंर जेव्हा भांडणं सुरू होतात आणि हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचतं. पोलीसही आम्हाला मदत करत नाहीत. या प्रसंगात आम्ही समाजातून बाहेर फेकले जातो आणि वेगळ्या दृष्टीकोनातून आमच्याकडे पाहिलं जाऊ लागतं. एकतर पत्नी आमच्यासोबत नांदत नाही आणि नांदली तरी ती सुखाने जगू देत नाही”, अशी व्यथा एका पत्नीपीडित पतीने यावेळी मांडली.तसेच आणखी एकाने आपलं मत मांडलं, ते म्हणाले की, “वडाची पूजा केल्याने सात जन्म हाच पती लाभत असेल तर पिंपळ हा मुंजा आहे. त्यामुळे आम्ही वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळ पूजन करतो आणि मुंजाला साकडे घालतो की, हे मुंजा आम्हाला अशा भांडखोर बायका देऊन मरण यातना देण्यापेक्षा कायम स्वरुपी मुंजा ठेव. खूप खूप वर्षांपूर्वी स्त्रिया अबला होत्या. त्यांचे सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले. ते कायदे बनवताना पुरुष अबला होणार नाही याची दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळे आता महिला सबला होऊन पुरुष अबला झाला आहे.”


