दिवा चौकातील वाहतुक कोंडी सोडवा, मनसेचे वाहतुक पोलिसांना निवेदन,अन्यथा मनसैनिक रस्त्यावर उतरतील मनसेने दिला इशारा..
अमित जाधव - संपादक
दिवा (प्रतिनिधी) दिवा चौकातील वाहतुक कोंडीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.सायंकाळी ७ नंतर याठिकाणी वाहतुक पोलिसांचे नियंत्रण नसल्याचा फटका नागरिकांना बसत असून ही कोंडी सोडविण्यासाठी आता मनसेने वाहतुक पोलिसांना नुकतेचे निवेदन दिले आहे.याठिकाणी वाहतुक पोलिसांची तात्काळ नेमणुक करा,वाहतुक कोंडी सोडवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते स्वता रस्त्यावर उतरुण ही समस्या हाताळतील असा थेट इशारा देण्यात आला आहे.
दिवा चौकात दरदिवशी अनेक वाहनांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी दिवा रेल्वे स्टेशन ते दिवा चौक,शिळफाटा ते दिवा चौक आणि आगासन रोड ते दिवा चौक अश्या तीन ठिकाणांची वाहने दिवा चौकातून येजा करीत असतात.त्यातच ठाणे महानगरपालिकेचे बस स्टँड नसल्याने पर्यायी थांबा म्हणून दिवा चौकच निवडण्यात आला आहे.त्यामुळे पालिकेच्या बसेसही येथून वळविण्यात येत असल्यामुळे सायंकाळच्या वेळेनंतर या चौकात नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष...
ठाणे महानगरपालिका हद्दीत अनेक मोक्याच्या ठिकाणी वाहतुक पोलिसांची नेमणुक करण्यात आली आहे.मात्र दिवा चौकात वाहतुक पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.त्यामुळे अनेक वाहने शिस्तीचे पालन करताना दिसून येत नाहीत.याठिकाणी वाहतुक पोलिसांची नेमणुक केल्यास येथील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केल्यास कोंडीला चाप बसू शकतो.तसेच होणारे अपघातही टळू शकतात.परंतु आजतागायत या ठिकाणी वाहतुक पोलिसांनी दुर्लक्ष झाल्याचे पहायला मिळत आहे.
मनसेचा इशारा..
सायंकाळच्या दरम्यान होणारी वाहतुक कोंडी लक्षात घेता मनसेचे दिवा शहर अध्यक्ष श्री तुषार पाटील यांनी वाहतुक पोलिसांना निवेदन दिले आहे.या निवेदनात त्यांनी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत वाहतुक पोलिसांची नेमणुक करावी आणि वाहतुक कोंडीला आळा घालावा असे म्हटले आहे.मात्र वाहतुक पोलिसांकडून तरीही दुर्लक्ष करण्यात आल्यास मनसेच्या स्टाईलमध्ये मनसे स्वता रस्त्यावर उतरुन होणारी वाहतुक कोंडी सोडवेल असा इशारा देण्यात आला आहे.