गणपती विसर्जनादरम्यान पाच जण बुडाले ; दोघांना वाचवण्यात यश….
अमित जाधव-संपादक
मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान पाच मुलं समुद्रात बुडाल्याची माहिती समोर येत आहे.
वर्सोवा जेट्टी येथे रविवारी
गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी समुद्रात उतरलेले पाच जण समुद्रात बुडाले आहेत.
त्यापैकी, दोन मुलं बचावली आहेत तर,
तीन जण अद्याप बेपत्ता आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बी.एम.सी.) रविवारी याबाबतची माहिती दिली आहे.
समुद्रात बुडालेल्या पाच जणांपैकी दोघांना स्थानिकांनी वाचवलं आणि त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तर उर्वरित तिघांचा मुंबई अग्निशमन दल शोध घेत आहे.
बचाव कार्य सुरू आहे,
अशी माहिती बी.एम.सी.ने दिली आहे.
बी.एम.सी.ने याबाबतचं ट्विट केलं आहे.
या घटनेनंतर, मुंबईतील गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याचं म्हटलं जात आहे.
“ही विसर्जनासाठी ठरवून दिलेली जागा नव्हती.
आम्ही लोकांना इथे गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यावर बंदी घातली होती.
मात्र, तरीही अनेक जण इथे दाखल झाले”,
असं वर्सोवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मनोज वामन पोहाणेकर यांनी सांगितलं आहे.
“या शोध मोहिमेसाठी नौदलाचे डायव्हर्स आणि पोलिसांच्या बोटीची मदत घेण्यात आली आहे”,
अशी माहिती मुंबई अग्निशमन विभागाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याने अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे.



