दसरा समजून घेताना…..
जगातील अनेक देशांपैकी भारत हा असा देश आहे जिथे प्रत्येक संस्कृतील सण- उत्सव आनंदाने व पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. नऊ दिवसांची नवरात्री साजरा केल्यानंतर दसरा हा सण साजरा केला जातो. दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे.या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते. या सणाच्या दिवशीच देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले,शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी सुरवात केली, बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत असतं. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यास जात असत. दसरा म्हणजेच विजयादशमी . साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस असं म्हंटलं जातं. याच दिवशी आपट्याची (ज्याला सोन्याचं पान म्हंटलं जाते) पाने लुटली जातात. दसरा सणाला धरून तुकाराम महाराजांच्या उक्तीत
असं लिहिलं गेलं आहे की
“साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी-दसरा !”
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी सोनं खरेदीसाठी बाजारात तौबा गर्दी पहायला मिळते.
दसरा शब्दीची व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दस-याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देेवीच्या शक्तीने भरलेल्या असतात, नियंत्राणत आलेल्या असतात, दाही दिशांवर विजय मिळवलेला हा दिवस असतो. आपट्याच्या पानांच्या संदर्भात असं म्हंटलं जातं की दसरा हा ह्रदयाचा महोत्सव आहे, म्हणून ह्रदयाच्या आकाराची आपट्याची पाने एकमेकांना सुवर्ण म्हणून द्यायची असतात. अश्याप्रकारे दसरा सण साजरा करण्याची पद्धत भारतात आहे.
अदिती संभाजी कविलकर
सलाम बॉम्बे फाऊंडेशन
इ. ९ वी ना.म.जोशी मार्ग शाळा, करी रोड


