पाणी द्या आम्हाला मदत नको ,संदप गावात सांत्वन करण्यासाठी रामदासजी आठवले गेले असता गावकऱ्यांनी….
अमित जाधव-संपादक
डोंबिवली जवळील संदप गावात गेल्या आठवड्यात खदानीत बुडून एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले त्या गावात गेले होते. यावेळी त्यांनी ५० हजार रूपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यावर कुटुंबियांनी आम्हाला तुमची मदत नको. पहिले पाणी द्या. उलट आम्हीच तुम्हाला ५० हजार रूपये देतो, असे त्यांना सुनावले.पाच वर्षापासून गावात पाणी नाही. पाणी टंचाईमुळे लोकांना गावाबाहेरील पाणवठ्यावर अवलंबून राहावे लागते. पाणी टंचाईमुळे आमच्या कुटुंबातील पाच जणाचा मृत्यू झाला. आमदार, खासदार आश्वासन देतात आणि निघून जातात. पाणी प्रश्न तसाच आहे. तुम्ही मदत देत असाल तर तुमची मदत नको. पहिले पाणी द्या, अशा शब्दात गायकवाड कुटुंबातील सदस्याने मंत्री आठवले यांना सुनावले.
यानंतर पोलिसांनी संतप्त सदस्याला बाजुला केले. यावेळी संदप गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलू. मुख्यमंत्री निधीतून गायकवाड कुटुंबातील सदस्यांना मदत मिळेल यासाठी पत्र लिहीणार आहे. गाव परिसरातील खदानी बुजून टाका, असे शासनाला कळविले आहे, असे आठवले यांनी सांगितले.


