आता ठाणे जिल्ह्यातील आरोग्य केंद्रावर सर्पदंशावर उपचार….
अमित जाधव-संपादक
ठाणे- कल्याण- ठाणे जिल्ह्याच्या सात तालुक्यांमधील गाव, आदिवासी पाड्यांवर असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये सर्प दंशावर उपचार करण्यात येणार आहेत. अनेक वेळा प्रशिक्षित कर्मचारी आरोग्य केंद्रात नसल्याने रुग्णाला उपचारासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवावा लागतो. ही वेळ यापुढे येणार नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आरोग्य विभागाने गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, डॉक्टर, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सर्प दंशाची आवश्यक वैद्यकीय सामग्री, औषध, गोळ्यांचा पुरेसा साठा देऊन, या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा, प्रशिक्षित मनुष्यबळ आहे की नाही याची चाचपणी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुरबाड, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर तालुक्यांमधील आरोग्य केंद्रांचा या सेवांमध्ये समावेश आहे.गेल्या दीड वर्षात शहापूर तालुक्यात ५०५ ग्रामस्थांना सर्प दंश झाला. २२४ जणांना विंचवाने दंश केला होता. या दंशांनी एकूण आठ रुग्णांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्प दंशाची इंजेक्शन उपलब्ध असतात. तेथेच दंश झालेल्या रुग्णावर उपचार करणे अपेक्षित असते. अनेकवेळा इंजेक्शन दिल्यावर रुग्णावर काही वेळ दुष्परिणाम होऊ शकतो. अशावेळी त्या रुग्णाला त्याच्या परिस्थितीप्रमाणे तालुका, जिल्हा पातळीवर पाठविण्याची सूचना करतात. जोखमीचा रुग्ण असेल तर वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा दंश झालेल्या रुग्णावर स्थानिक कर्मचारी उपचार करतात. आरोग्य केंद्रात प्रशिक्षित कर्मचारी वर्ग असतो. काही नवीन कर्मचारी असतील ते सहयोगी कर्मचारी, वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन काम करतात, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.