स्मार्ट सिटी योजनेच्या सर्वेक्षणात सहभागी होण्याची वेळ आली, ठाणेकरांनो मोठ्या संख्येने मत द्या ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आवाहन…
अमित जाधव-संपादक
स्मार्ट सिटी योजनेच्या सर्वेक्षणात सहभागी होण्याची वेळ आली, ठाणेकरांनो मोठ्या संख्येने मत द्या
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आवाहन
ठाणे :* शहराच्या नियोजनाचे धोरण ठरवताना नागरिकांचा त्यात सहभाग कसा वाढवता येईल, यासाठी एक मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याचे काम केंद्र सरकार स्मार्ट सिटी योजनेत करते आहे. या प्रक्रियेचे वेगवेगळे टप्पे असून जनमानस जाणून घेण्यासाठीचे *’नागरिक आकलन सर्वेक्षण-२०२२’* एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यात ठाणेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांची मते नोंदवावीत, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत, शहराशी निगडित विविध स्वरूपाच्या माहितीचे संकलन वेगवेगळ्या विभागांकडून सुरू होते. शहरात सार्वजनिक वाहतूक कशी आहे? अतिक्रमण व्याप्त जागा किती आहे, शाळा किती, मैदाने किती अशी सुमारे ३७२ प्रकारची माहिती ठाणे महापालिकेने संकलित करून दिली. तर, काही माहितीचे संकलन केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने केले आहे. स्मार्ट सिटी हा उपक्रम या मंत्रालया अंतर्गत येतो. या बद्दलची सविस्तर बैठक आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे आयोजित करण्यात आली होती. त्यास स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, मुख्य तांत्रिक अधिकारी
प्रवीण पापळकर, तसेच वरिष्ठ अधिकारी, सल्लागार उपस्थित होते.
या निमित्ताने, केंद्र सरकार माहितीचे प्रमाणीकरण करत असून उत्तम कामगिरी करणाऱ्या शहराला पारितोषिक मिळणार आहे. यापूर्वी, ठाणेकरांनी भारतीय स्वच्छता लीगच्या वेळी उत्तम काम केले होते. त्यामुळे, ‘सर्वाधिक प्रभाव निर्माण करणारे शहर’ या गटात ठाण्याला पारितोषिक मिळाले होते. ठाणेकरांच्या जनमताचा कौल याही वेळी लागेल, अशी स्मार्ट सिटी प्रशासनाला अपेक्षा आहे.
देशात झपाट्याने नागरीकरण होत आहे. २०११मध्ये ३७.७ कोटी म्हणजे ३१ टक्के लोकसंख्या नगरात राहत होती. ते प्रमाण २०३० पर्यंत ६० कोटींपर्यंत जाईल असा अंदाज आहे. देशाच्या आर्थिक विकासात शहरांचे योगदानही महत्त्वपूर्ण आहे. शहरे सुरक्षित राखणे, उत्तम दर्जाची आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा देणे, स्वच्छ हवा राखणे आणि रोजगारांच्या संधी निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. आता माहितीचे संकलन आणि प्रमाणीकरण होत आहे. केंद्र सरकारद्वारे या माहितीची छाननी झाल्यावर ती नागरिकांसाठी खुली होणार आहे.
मत नोंदण्यासाठी…
याच कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात केंद्र सरकार शहरातील नागरिकांनाही समाविष्ट करून त्यांच्या प्रतिक्रिया आणि सूचना जाणून घेण्यासाठी ‘नागरिक आकलन सर्वेक्षण २०२२’ देशातील १०० स्मार्ट शहरात दि. ०१ नोव्हेंबर २०२२पासून सुरू होणार आहे. त्यात ऑनलाइन पद्धतीने मत नोंदवता येणार आहे. त्याची लिंक उपलब्ध आली की ठाणेकरांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
संकलित माहितीचा धोरणासाठी उपयोग
ही एक प्रकारची स्पर्धा असून देशभर एकाच वेळी १०० शहरात घेतली जाणार आहे. ठाण्याला वरचा क्रमांक गाठायचा आहे. हे लक्षात घेऊन स्मार्ट सिटी आणि पालिकेची यंत्रणा नागरिक यांना एकत्र काम करावे लागेल. तसेच, माहिती गांभीर्यपूर्वक गोळा केली तर त्या संकलित माहितीचा धोरण ठरवताना उपयोग होईल.
– अभिजीत बांगर, आयुक्त ठाणे महानगरपालिका
पारदर्शक आणि सर्वसमावेशक
केंद्र सरकार त्या माहितीचे विश्लेषण करून शहर विकासाच्या दृष्टीेने महापालिकेला मार्गदर्शिका उपलब्ध करून देणार आहे. पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि वेगवेगळ्या शहरांची असल्याने ही माहिती अभ्यासपूर्ण असेल.
– संदीप माळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी.
….
रविवारी झाली जागृती सायकल रॅली
‘नागरिक आकलन सर्वेक्षण २००२’मध्ये मतदानाबाबत ठाणेकरांशी संवाद साधण्यासाठी, तसेच, ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, ठाणे महानगरपालिका, ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि ‘व्हील्स अँड बॅरल्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन रविवारी करण्यात आले.
सायकल स्वारांच्या गटाचे चिराग शहा यांनी सायकल स्वारांची ओळख करून दिली. तसेच, जनजागृतीसाठी कायम उपलब्ध राहू, असे सांगितले. तर, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख स्वरूप कुलकर्णी यांनी सर्वेक्षणाची माहिती देऊन सहभागी व्हावे अशी विनंती केली. रॅली नंतर कार्यकारी अभियंता महेश अम्रुतकर यांनी खाडी किनारा सुशोभीकरण प्रकल्पाची माहिती दिली आणि मग सगळ्यांनी तो प्रकल्प जाऊन पाहिला. यावेळी, समनव्यक सुधीर गायकवाड, सचिन चौधरी, नितीन डुंबरे, अखिल मेश्राम, योगिता गुजर, साकेत शर्मा.